सातारा – करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कास पठार परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील काही पर्यटक कास पठारावर येऊन फुलांमध्ये विनापरवानगी प्रवेश करत आहेत. अशा विनापरवानगी येणाऱ्या पर्यटकांवर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. रविवारी या कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पठार नैसर्गिक रंगीबिरंगी रानफुलांनी बहरले आहे. दरवर्षी देशातील नव्हे तर परदेशातील पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्याने कासचा हंगाम धोक्यात आला आहे. याठिकाणी वन विभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे. करोनाच्या महामारीतही पर्यटनस्थळे बंद असतानाही नैसर्गिक फुलांचा आनंद लुटण्याचा मोह पर्यटकांना आवरेनासा झाला आहे.
अनेक पर्यटक कास पठाराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कास रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. काही पर्यटक रस्त्यावरूनच फुलांचा आनंद लुटत आहेत. तर काही पर्यटक कुंपण जाळीच्या खालून फुलांच्या राखीव क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करत आहेत.
करोनामुळे शासनाने पर्यटन बंदी कायम ठेवली असल्याने वन समितीने यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी बंद ठेवल्याचे जाहीर करत पर्यटकांनी कास पठारवर येऊ नये, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. पर्यटक बंदीबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र, अनेक पर्यटक कास पठारावर येऊन कुंपणाच्या आत फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत आहेत.
या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या सूचनेनुसार वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शनिवार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कास पठारावर पर्यटकांनी गर्दी केली होती. कुंपणाच्या आत फुलांमध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर प्रत्येकी 500 रूपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. कास पठारावर कोणीही पर्यटनासाठी येऊ नये, फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा वन समितीच्यावतीने देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर तरी पर्यटक शिस्त पाळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.