पिलीव, वेळापूरच्या अतिवृष्टी भागाची आमदार राम सातपुते यांनी केली पाहणी
अकलूज (वार्ताहर) –माळशिरस तालुक्यात सोमवारी (दि. 4) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती गंभीर बनून रामोशी (नाईक वस्ती), सुतारगल्ली, हरीजन वस्ती, मातंग वस्ती भागात पाणी शिरले आणि परिसरात नुकसान झाले. आमदार राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी तातडीने पिलीव भागाला भेट दिली.
सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिलीव व वेळापूर परिसरात मुसळधार पावसामुळे पिलीव गावात पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे पडझड आणि घरांचे नुकसान झाले असून, बचेरी रस्ता ते बायपास रस्त्यापर्यंत असणाऱ्या ओघळीवर लगतच्या नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ओघळीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे वारंवार येणाऱ्या पावसाच्या पुरामुळे ओघळीत पाणी राहत नाही. रात्री उशिरापर्यंत नुकसानग्रस्त कुटुंबाची पडझड झालेल्या घराची आमदारांनी पाहणी केली.
तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सर्कल यांना बाधितांना तात्काळ आपत्कालीन निधीतून मदत उपलब्ध करून देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यावेळी मातंगवस्ती, हरिजन वस्ती, रामोशी (नाईकवस्ती) याठिकाणी ओघळीवर केलेल्या अतिक्रमणाचीही पाहणी करून तातडीने कारवाई करण्याची सूचना तलाठी, सर्कल, ग्रामविकास अधिकारी यांना दिल्या. झिंजे वस्तीला जोडणारा दादरी पूल कोसळून पडल्याने नागरिकांना सुरक्षितपणे कॅनॉल ओलांडून जाता येत नाही.
याठिकाणी तातडीने पूल बांधावा, अशी मागणी प्रमोद भैस व माजी सरपंच नारायण सुळे यांनी केली. यावेळी अमरसिंह माने देशमुख, सर्कल तपासे, तलाठी संजय जाधव, ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर आदीसह नागरिक उपस्थित होते.