अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात पायी जाणाऱ्या दिंडीला धडक दिल्याने पाच महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी घडली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील भगवान बाबा दिंडी पायी जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. ही घटना जेऊर शिवारातील जरे वस्तीजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात रत्नाबाई सुधाकर पाटील ( वय ६० रा. घोरगाव जि. जळगाव), भिकुबाई भगवतीराव पाटील (वय ६८ रा. साखरखेडा ता. अमळनेर जि. जळगाव), निर्मला लक्ष्मण सपकाळ (वय ६२ रा. साखरखेडा) कल्पना विजय कोळी (वय ५० रा. साखरखेडा), मलताबाई गोकुळ कोळी (वय ४७ रा. साखरखेडा) या महिला जखमी आहेत. जखमी महिलांवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सदर घटना घडल्यानंतर अपघात निश्चित कोणत्या गाडीने घडला याची माहिती समजली नाही. परंतु वारकऱ्यांनी बलेनो गाडी (क्र. एम. एच. २० इ. वाय. ९६९५) याच गाडीने महिला वारकऱ्यांना उडविले असल्याचे सांगण्यात आले. तर प्रत्यक्षदर्शी या वाहनाचा अपघातात संबंध नसल्याचे सांगत आहेत.
यावेळी वारकऱ्यांकडून बलेनो चालकास मारहाण करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कसलीच नोंद करण्यात आली नाही.