कोलंबो – आपल्याकडे आता इंधनखरेदीसाठी पैसेच नाहीत, अशी स्पष्ट कबुली श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी संसदेत बुधवारी दिली. त्यामुळे आता त्या देशातले दळणवळण पूर्णत: ठप्प होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कर्जाचा प्रचंड बोजा, एकाच कुटुंबाच्या हातात एकवटलेली सत्ता यामुळे श्रीलंका भरडली गेली. त्यातच पर्यटन हा व्यवसाय त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र दोन वर्षांतल्या करोनाच्या लाटांनी तोच भूईसपाट केल्यामुळे श्रीलंकेत अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. अशा अत्यंत खडतर काळात विक्रमसिंघे यांनी देशाची आणि अर्थव्यवस्थेची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र आता आपल्याकडे आता इंधनालाही पैसे नसल्याचे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जगभरातील कोणताही देश किंवा संघटना आपल्याला इंधन देण्यासाठी तयार नाहीत. रोकडीच्या बदल्यात इंधन देण्यासही ते राजी नाहीत, असे विक्रमसिंघे यांनी संसदेला सांगितले.
श्रीलंकेची परकीय गंगाजळी आटत असताना वेळीच त्याला पायबंद घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अर्थव्यवस्थेची घसरण रोखण्यासाठी सुरुवातीलाच काही पावले उचलली असती, तर आज एवढे मोठे संकट उभे राहिले नसते. परंतु आपण ती संधी गमावली. आता अर्थव्यवस्था तळ गाठण्याच्या मार्गावर आहे, असे विक्रमसिंघे म्हणाले.
भारताने दिलेल्या चार अब्ज डॉलरच्या कर्जाच्या बळावर श्रीलंका तूर्तास तरली असली, तरी भारतही फार काळ श्रीलंकेला मदत करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.