अकोले – पराभव अनपेक्षित आहे.विजयाची खात्री होती. परंतु जनतेने दिलेला निकाल हा मी खुल्या दिलाने स्वीकारतो. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी मतदारसंघाची फेरी काढून आपण त्याचे विश्लेषण करू, असे महायुतीचे पराभूत उमेदवार व माजी आमदार वैभव पिचड यांनी पत्रकारांना सांगितले.
विशेषबाब म्हणजे वैभव पिचड हे मतमोजणी सुरू झाल्यापासून तर निकाल लागेपर्यंत मतदान मोजणीच्या ठिकाणी बसून होते. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी यशवंत आभाळे होते. निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या चेहऱ्यावरील नाराजी ते लपू शकले नाहीत. मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलणे पसंत केले. ते म्हणाले की, पक्ष बदलण्याचा परिणाम आपल्याला मान्य नाही. श्रीगोंदा पॅटर्न की आणखी कोणता पॅटर्न? पराभव करून गेला ते पाहावे लागेल. त्यामुळे आपला पराभव झाला का? याची कारणमीमांसा शोधावी लागेल. यापुढे आणखी काही अडचणी निर्माण होतील काय? राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालूच राहील. पण पराभव कारणे पाहणे व शोधणे हे उचित ठरेल असे ते म्हणाले.
यानिमित्ताने त्यांनी पवार कुटुंबीयांचे नाव न घेता, काहींना जिल्हा सहकारी बॅंकेच्या पदाचे आश्वासन दिले गेले आहे. काहींना विधानपरिषदेचे आश्वासन दिले गेले आहे. आणि आणखी अन्य काही आश्वासने दिली गेल्यामुळे आपला पराभव झाला. त्याचा हातभार लागला. विरोधकांची त्यामुळे एकजूट झाली असे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितले. आतापर्यंत जनतेने आपल्याला व वडिलांना जे पाठबळ दिले त्याबद्दल आणि आताही ज्या मतदारांनी मतदान केले. त्यांनाही आपण धन्यवाद देतो. त्यांच्याबाबत निश्चितपणाने कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानतो. असे स्पष्ट करून त्यांनी नवीन आमदारांना शुभेच्छा दिल्या. आणि त्यांची कारकीर्द चांगली व्हावी. त्यांना कारकीर्दीच्या शुभेच्छा देताना आपण विकासकामांना यापुढेही साद घालू असे यावेळेस पत्रकारांना सांगितले.
आपल्या पूर्वीच्या पक्षातील घड्याळ चिन्हाचा वापर आपल्या विरोधात केला गेला काय? आणि त्यामुळे आपला पराभव झाला काय? आम्ही कुठे कमी पडलो? ते पाहावे लागेल. आणि त्यामध्ये जुने चिन्ह आणि नवीन चिन्ह यांची मतदारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती काय? हे तपासावे लागेल असे ते म्हणाले. संगमनेर तालुक्याचा पठार भाग हा अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. तेथे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आघाडीचा धर्म पाळला आणि त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे हे स्वाभाविक आहे, असे स्पष्ट करून वैभव पिचड म्हणाले की, बाळासाहेब थोरात राज्यातील कॉंग्रेसचे पक्षप्रमुख आहे. त्यांनी आघाडी धर्म पाळला नसता तर ती त्यांची चूक ठरले असती असे शेवटी निदर्शनास आणून दिले. आणि पत्रकार आणि सोशल मीडियाने आपल्याला जे पाठबळ दिले त्यांचेही त्यांनी शेवटी आभार मानले.