नवी दिल्ली – चीनच्या नौदलाला टक्कर देण्यासाठी भारताने सहा पाणबुड्या उभारण्यासाठी 55 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला रविवारी सुरवात केली, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी रविवारी दिली.
या पाणबुड्या भारतातच बनवण्यात येणार असून त्यात भारतीय कंपन्या सहभागी होऊ शकतात. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यात परदेशी कंपन्यांना सहभागी करता येण्याची मूभा असेल.
भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या विविध समित्यांनी पाणबुडींमध्ये हवी असणारी वैशिष्ट्ये आणि या महाकाय प्रकल्पासाठी महत्वाच्या गरजा यांची यादी आरएफपीसाठी (प्रस्तावाठी विनंती) तयार केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात हा आरएफपी पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दोन भारतीय जहाज कंपन्या आणि पाच परदेशी संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपन्या यांची प्राथमिक निवड केली आहे. सरकारने निवड केलेल्या कंपन्यांमध्ये एल अँड टी आणि सरकारी मालकीच्या माझगाव डॉकचा समावेश आहे. तर तासनक्रुप मरिन सिस्टिम (जर्मनी), नवनतीया (स्पेन), आणि नेव्हल ग्रुप (फ्रान्स) यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अझगाव डॉक आणि एल अँड टीला आरएफपी पाठवल्यानंतर त्या आपल्या तपशीलवार निविदा सादर करतील. या पाचमधील आपल्या पार्टनरची निवड करण्याचा अधिकार या दोन कंपन्यांना असेल. भारतीय नौदलाने 24 पाणबुड्यांची योजना आखली आहे. त्यातील सहा आण्विक हल्ला करण्यास सक्षम असतील. त्यामुळे समुद्रातील युध्दाची क्षमता वाढेल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या भारताकडे 15 पारंपरिक आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत.
नौदलाने देशाच्या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या हिंदी महासागरातील आपले अस्तित्व वाढवण्यास सुरवात केली आहे. त्या भागात सध्या चीनच्या नौदलाचा वावर खूपच वाढला आहे. सध्या चीनकडे 50 पाणुड्या आहेत. तर 350 युध्दनौका आहेत.