मंत्र्यांकडे तक्रार करणार !
प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत कितीवेळा माहिती दिली गेली? महिन्याच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहून आढावा द्यावा अशी अपेक्षा आहे. मात्र, बैठकीदिवशी अधिकारी रजा घेतात, हे सतत कसे होऊ शकते? असा संताप शंकर चव्हाण व सभापती सचिन हुलवान यांनी व्यक्त केला. अनुपस्थित अधिकाऱ्यांची तक्रार मंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्याचे ठरले.
इस्लामपूर – बांधकामसह सर्वच विभागाचे अधिकारी पंचायत समितीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत याबाबत शुक्रवारी झालेल्या इस्लामपूर पंचायत समितीच्या मासिक सभेत निषेध करण्यात आला. तसेच शासकीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. अधिकारी बैठकीला फिरकत नसल्याच्या रागातून पंचायत समितीकडून बांधकाम विभागाला कोणतीही मदत न करण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी झाला. यावेळी सदस्य देवराज पाटील आणि शंकर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. हे अधिकारी पंचायत समितीच्या कोणत्याही सभेला उपास्थित नसतात. वारंवार सूचना देऊनही अधिकारी येत नसतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांना काय उत्तरे द्यायची? असा सवाल उपस्थित केला.
जिल्हा वार्षिक निधीतून 15 शाळा खोल्या मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. ऍनिमियामुक्त भारत अंतर्गत महिलांना हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी कार्यक्रम सुरू असून त्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. सर्वांनी आपल्या घरापासून सुरुवात करण्याचे आवाहन केले. त्यासाठी शाळेत आवळा, चिंच, पेरुचे झाड लावावे, हे खाऊन शरीरातील क जीवनसत्व प्रमाण वाढेल अशा सूचना दिल्या.
डेंग्यूप्रश्नी प्रत्येक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्याचे डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. खासगी डॉक्टरांना अतिरिक्त बिलांच्या मुद्यावर नोटीस दिली आहे. देवराज पाटील यांनी आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधे दिली जात नसल्याची तक्रार केली. तपासणी व उपचाराशी संबंधित खर्चाचे दर निश्चित असावेत व त्याची माहिती एका ऍपवर मिळावी, अशी अपेक्षा सभापतींनी व्यक्त केली.
इस्लामपूर-कोल्हापूर मार्गावरील बसमधील वाहक प्रवाशांशी उद्धट वागणूक देत असल्याची तक्रार झाली. त्यांना समज देण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना वेळेत पास द्या, त्यांचे आर्थिक नुकसान करू नका अशी मागणी झाली. महापुरातील नुकसानीशी संबंधित अत्यल्प काम शिल्लक राहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.