महाबळेश्वर – पालिकेतील सत्ताधारी भाजपला महाविकास आघाडीने आज चांगलेच खिंडीत गाठले. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आजच्या विषय समित्यांच्या निवडीच्या विशेष सभेवर बहिकार टाकल्याने एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाला आजची सभा तहकूब करावी लागली. सभा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.
राज्य शासनाने अधिनियमात बदल करून पालिकेतील सर्वसाधारण सभेपेक्षा स्थायी समितीला अधिक अधिकार दिल्याने नगराध्यक्ष महत्त्वाचे विषय स्थायी समिती सभेत मांडत आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांना त्यांची माहितीच नसते. स्थायी समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सर्व विषय समित्या बरखास्त झाल्या. या समितीचे पदाधिकारी नेमण्यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विशेष सभेस एकही नगरसेवक हजर नसल्याने सभाच बरखास्त करण्यात आली होती.
स्थायी समिती नसल्याने विषय थेट सर्वसाधारण सभेत ठेवले जात असल्याने नगरसेवक समाधानी होते. मात्र, स्थायी समिती व विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने आज पुन्हा विशेष सभा बोलावली. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बैठक घेऊन सभेला दांडी मारायचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी कृतीत आणल्याने विशेष सभा होऊ शकली नाही. त्यामुळे सत्ताधारी कोंडीत सापडले आहेत. आता स्थायी समिती अस्तित्वात येत नाही तोवर सर्वच विषय सर्वसाधारण सभेत मांडावे लागणार आहेत. उपनगराध्य अफजल सुतार, संदीप साळुंखे, नासीर मुलाणी, रवींद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील, उज्ज्वला तोष्णीवाल, विमल पार्टे, संजय पिसाळ या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.