हिमांशू
गेले चार-पाच दिवस आपलं सगळ्यांचं लक्ष रशिया आणि युक्रेन संघर्षावर खिळून राहिलंय. लष्कराशी अजिबात संबंध नसलेल्या अनेकांच्या अंगात शांतताकाळातही सतत युद्धज्वर संचारलेला असतो. युक्रेनमधील दृश्यं बघून अशी उन्मादप्रिय माणसंही थिजून गेलीत. युद्ध काय असतं, हे आपला पोटचा गोळा देशसेवेसाठी देणाऱ्या मातेलाच सर्वाधिक कळलेलं असतं. पडद्यावर युद्धपट पाहून अनेकांच्या अंगात वीरश्री संचारते; पण घरावरून शत्रुराष्ट्राची विमानं घरघरू लागली की घाम फुटतो. खात्या-पित्या घरातल्या लोकांना सुरक्षित वातावरणात, ढेकर देत-देत आंतरराष्ट्रीय राजकारणावर धडाधड मतं मांडता येतात; परंतु काही देशांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार युद्धाचा विस्तार खरोखर वाढला आणि त्याची झळ परदेशांत असलेल्या आपल्या मुलांना पोहोचली,
तर काय होईल, असा प्रश्न विचारला तर या कथित पंडितांची बोलती बंद होते. घराला झळ पोचल्यावरच युद्ध काय असतं हे समजतं. अनेकांना केवळ जिवंत राहण्यासाठी आणि कुटुंबाला जगवण्यासाठी परिस्थितीशी दररोज “युद्ध’ करावं लागतं; पण आपलं त्यांच्याकडे लक्षही जात नाही. ज्यांना आपल्या मनाशी युद्ध करावं लागतं त्यांचा संघर्ष तर पराकोटीचा असतो. कारण असं म्हणतात, की स्वतः विरुद्धचा संघर्ष हेच खरं युद्ध असतं. असे “योद्धे’ आपल्याला प्रत्येक क्षेत्रात भेटतात; परंतु आपण त्यांना “हिरो’ मानत नाही. क्रिकेटच्या मैदानात जो प्रतिकूल परिस्थितीत तळपला तो “योद्धा’ म्हणजे विष्णू सोळंकी!
सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांच्याइतकी कीर्ती विष्णू सोळंकीला अजून मिळालेली नाही. परंतु या दोघांनी ज्या परिस्थितीत मैदान गाजवलं, तेच विष्णूने करून दाखवलं. रणजी स्पर्धेत बडोद्याकडून खेळणारा हा उमदा खेळाडू चंडीगडविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात शतकवीर ठरला. काही दिवसांपूर्वीच विष्णूला कन्यारत्न झालं. घरात आनंदाचं वातावरण असतानाच नवजात मुलीच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आणि अखेर त्या चिमुकलीने काही दिवसांतच जग सोडलं. पित्याला अपत्यावर अंत्यसंस्कार करावे लागणं, यासारखं दुर्दैव दुसरं नाही. साहजिकच विष्णूलाही या घटनेचा मोठा धक्का बसला. परंतु रणजी स्पर्धा समोर होती.
हिंमत न हरता त्याने हातात बॅट घेतली आणि मैदानात उतरला. चंडीगडविरुद्ध 103 धावा करताना त्याने 12 चौकार लगावले. त्याची ही खेळी पाहून बडोदा क्रिकेट संघटनेने “रिअल हिरो’ म्हणून त्याचं कौतुक केलंच; पण ज्या संघाविरुद्ध त्याने धावांचा पाऊस पाडला त्या चंडीगडच्या खेळाडूंनीही त्याला मानाचा सलाम केला. प्रतिपक्षाला सलाम करायला लावणाराच खरा “योद्धा’ असतो. क्रीजवर गार्ड घेताना विष्णूच्या मनात काय-काय आलं असेल? गमावलेल्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला असेल का? अशा वातावरणात घर सोडताना विष्णूच्या कुटुंबीयांना विशेषतः पत्नीला काय वाटलं असेल?
या घटनेमुळं 1999 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आठवणी ताज्या झाल्या. स्पर्धा सुरू असतानाच सचिन तेंडुलकरचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या निधनाची बातमी त्याला कळली आणि तो मायदेशी परतला. मात्र, त्याच्या आईनेच त्याला पुन्हा मैदानात उतरण्याचं बळ दिलं आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून सचिनने पुढच्याच सामन्यात 104 चेंडूंमध्ये 140 धावा काढल्या. रणजी सामन्यावेळी विराटनेही हेच अनुभवलं होतं. विष्णू सोळंकी या योद्ध्याच्या धैर्याला सॅल्यूट!