कोट्यवधींच्या योजना राबवल्या तरी यत्किंचित स्वच्छ न होणाऱ्या नद्या गेल्या काही दिवसांत एक पैसाही खर्च न करता स्वच्छ होऊ लागल्यात. राजधानी दिल्लीतून वाहणारी यमुना इतकी स्वच्छ दिसू लागलीय, की राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली प्रदूषण मंडळाकडून या चमत्काराचा अहवाल मागवलाय. कारखाने बंद असल्यामुळे सांडपाणी आणि कचरा नदीत जाणं बंद झालं आणि लोक नदीचे फोटो काढून व्हायरल करू लागले. या फोटोंचीच दखल हरित लवादानं घेतल्याचं प्रसिद्ध झालंय. खरं तर हे फोटो लोकांनी “स्टार’ करून जपून ठेवले पाहिजेत.
कारण कुणीही कितीही मान्य केलं तरी अखेर हवा आणि नद्या प्रदूषित होणं “अपरिहार्य’ आहे, हेच ऐकावं लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये निसर्गाच्या सुधारणाऱ्या परिस्थितीमुळे लोकांना जेवढा आनंद झालाय, त्यापेक्षा कितीतरी अधिक दुःख खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे होतंय. आर्थिक प्रगती साधायची असेल, तर निसर्गाचं मोल द्यावंच लागणार, प्रदूषण सहन करावंच लागणार.
हाच एकमेव मार्ग, हेच एकमेव “मॉडेल’ आहे, हे आपण जणू मान्यच करून टाकलंय. वास्तविक लॉकडाऊनच्या काळात निसर्ग आपल्याला त्याची ताकद दाखवून देतोय. निसर्गाच्या रक्षणासाठी, तथाकथित संवर्धनासाठी काहीएक करण्याची गरज नाहीये. एक पैसाही खर्च करण्याची गरज नाहीये. माणसाने फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, हस्तक्षेप थांबवला तरी अवघ्या काही दिवसांत जादू झाल्यासारखी परिस्थिती बदलू शकते. लोकांनी जसा अध्यात्म विरुद्ध विज्ञान हा झगडा विनाकारणच लावून दिलाय, तसाच निसर्ग विरुद्ध आर्थिक प्रगती असाही झगडा लावून दिलाय.
निसर्गाच्या नरडीला नख न लावू देता आपल्याला अर्थव्यवस्थेची वाढ करणं अशक्य आहे, हे आपल्या मेंदूत इतकं घट्ट बसलंय की एखादी पर्यायी विकास नीती असू शकते, याचा विचार करण्यासाठीही मेंदूत जागा राहिलेली नाही. किंबहुना पर्यायी विकास नीती हे एक ढोंग आहे; भंपकपणा आहे, असंही बोललं जातं. नैसर्गिक स्रोतांचे प्रचंड प्रमाणात दोहन करणं आणि त्यातून प्रचंड प्रमाणात संपत्ती निर्माण करणं, हेच आजचं ब्रिद आहे. प्रत्येकाला सात पिढ्यांचं कमावून ठेवायचं आहे; पण सातव्या पिढीला जगण्यासारखं वातावरण कोण शिल्लक ठेवणार, या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही.
वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाचं दोहन, शोषण आवश्यकच आहे, असा युक्तिवाद केला जातो; परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण होण्याचा वेग किती आहे आणि आर्थिक विषमता वाढण्याचा वेग किती आहे, हे उघड गुपित आहे. परंतु तरीही कोणत्यातरी श्रद्धेनं किंवा कोणत्यातरी भीतीनं आपण प्रवाहपतित होतो. हे प्रवाहपतित होणंच “अपरिहार्य’ असतं, म्हणून सगळंच “अपरिहार्य’ वाटू लागतं.
माणसांचा गजबजाट थांबल्यानंतर प्राणिजीवन खुलून आलंय. ओडिशाची किनारपट्टी विणीच्या हंगामासाठी आलेल्या कासवांनी गच्च भरलीय. ईशान्य आणि दक्षिण भारतात दुर्मिळ प्राण्यांचं दर्शन घडू लागलंय. धुराड्यांनी आणि वाहनांनी कार्बन ओकणं बंद केल्यामुळे महानगरांत श्वास घेणं सुकर झालंय. मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन पाण्यातून डोकं वर काढू लागलेत. खरं तर सक्तीनं का होईना, निसर्गाने आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण आपल्याला ते ऐकायला येईल, याची शक्यता खूपच धूसर आहे.