हिमांशू
जगभरात काय चाललंय..? आपल्या देशात काय चाललंय..? त्या साऱ्याचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे की नाही? असे प्रश्न कुणालाही पडावेत असंच वातावरण सध्या राज्यात आहे. तिकडे जगभरात ओमायक्रॉन खाऊ की गिळू रूप धारण करू लागलाय. त्याचे चटके भारतातही बसू लागलेत. मुख्य म्हणजे सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रातच आहेत. सेनादल प्रमुख बिपीन रावत यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण देश दुखवटा पाळतोय…
आणि महाराष्ट्रापुढचे प्रश्न कोणते? कुणी कुणाबद्दल अपशब्द वापरला? कुणाचा अपशब्द अधिक तिखट होता? कुणी कुणाला बसायला खुर्ची आणून दिली? कुणाला सत्तेची घाई झालीय? कुणी कुणाची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय समीकरणं कशी बदलतील? महाराष्ट्रातले उद्योग नेमके कुणी पळवले? कुणाच्या काळात अधिक उद्योग पळवले गेले? ते कुठल्या राज्यात गेले? आता नव्यानं उद्योग कोण पळवणार? त्याबद्दल बोलायचा अधिकार कुणाला आहे?
कुणाला नाही? कुणी कुठल्या व्यवहारात किती मलई खाल्ली? कोण, कधी, कोणती नवी घोषणा करणार? त्या घोषणेचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? कुणी कुणावर कोणता आरोप केला? कुणी कुणाच्या आरोपाला जोरदार वगैरे प्रत्युत्तर दिलं? कुणी कुणाविरुद्ध कोर्टात मानहानीचा खटला भरला? कुणी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं? कुणाच्या अपशब्दाची क्लिप खरी? कुणाची खोटी? उद्या कोण “आत’ जाणार? आतले बाहेर कधी येणार?
या सगळ्याचा कंटाळा न येण्याइतके बथ्थड झालोय का आपण? हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा प्रश्न. कदाचित आपल्यालाच हे हवं असेल. वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांकडे बोट दाखवून किंवा त्यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करून स्वतः नामानिराळं राहण्याचा प्रयत्न कुणीच करू नये. ज्या गोष्टीला “टीआरपी’ आहे, ती बोलली जाणार, छापली जाणार आणि दाखवलीही जाणार. त्यावर चर्चा होणार आणि फक्त त्यावरच चर्चा होणार.
आपले दैनंदिन प्रश्न केवळ तोंडी लावणं म्हणून सोबत असणार. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राजकीय लोकांमध्ये पूर्वीपासूनच झडत होत्या. परंतु आता त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश झाला. अधिकाऱ्यांनी नेत्यांवर आणि मग नेत्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप सुरू केले. पत्रकार परिषदा आणि ट्विट्सचा पाऊसच पडू लागला. आरोप-प्रत्यारोपांना व्यक्तिगत स्वरूप येऊ लागलं. न्यायालयाकडे हस्तक्षेपाची मागणी करावी लागली.
मग काही दिवस बऱ्यापैकी शांततेत गेले. परंतु एसटीच्या संपामुळे वातावरण गरमच राहिलं. अर्थात, राजकारणात वातावरण गरम “राहत’ नसतं; गरम “ठेवलं जातं’ हेही आपल्याला अजून कळलेलं नाही. आता मुंबई पालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत चालल्यात, तसतसा वातावरणानं चमत्कारिक रंग धारण केलाय. प्रकरण शिवीगाळ आणि अपशब्दांपर्यंत पोहोचलंय.
त्यातही आपण बोललो ते योग्यच आणि समोरचा चुकीचा, ही मखलाशी आहेच.
मध्यंतरी एका ट्विटमध्ये असाच एक अपशब्द येऊन गेला. परंतु तेव्हा वातावरण अधिक तापलं नाही. आता मात्र दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या आघाड्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करेपर्यंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देईपर्यंत प्रकरण तापलंय. हा कलगीतुरा केवळ आक्षेपार्हच नव्हे तर निषेधार्ह आहे.