भारतात 22 कोटी लोक दारिद्य्र पातळीच्या खाली
नवी दिल्ली, दि. 9 – देशात दारिद्य्र पातळीच्या खाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या 40 टक्के किंवा 22 कोटी एवढी आहे, असे उपलब्ध माहितीवरून दिसते. केंद्रीय नियोजन खात्याचे राज्यमंत्री विद्याचरण शुक्ला यांनी नुकतीच ही माहिती लोकसभेत दिली.
दारिद्य्ररेषेच्या खाली असणारांची संख्या केरळ व ओरिसामध्ये सर्वाधिक म्हणजे 61.7 टक्के इतकी आहे. 1964-65 सालातील उपलब्ध राज्यवार आकडेवारी पुढीलप्रमाणे- तामिळनाडू 52.1 टक्के, आंध्र प्रदेश- 50.1 टक्के, कर्नाटक- 49.6 टक्के, गुजरात- 48.2 टक्के, पश्चिम बंगाल- 47.7 टक्के व महाराष्ट्र 46.1 टक्के.
ग्रीसमध्ये प्रजासत्ताक पद्धतीची राजवट असावी
अथेन्स – ग्रीसमध्ये 142 वर्षे असलेली राजेशाही पुन्हा न आणता तेथे अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीची राज्यपद्धती चालू करावी, असा कौल ग्रीक जनतेने दिला आहे. ग्रीसमध्ये कोणत्या प्रकारची राज्यपद्धती असावी याबाबत काल सार्वमत घेण्यात आले, त्यात जनतेने दोन तृतीयांशहून अधिक मताधिक्याने हा कौल दिला.
92 टक्के मते आतापर्यंत मोजण्यात आलेली आहेत. एकूण मतदारांपैकी 68 टक्के लोकांनी प्रजासत्ताकाच्या बाजूने मत देऊन पदच्युत राजे कॉन्स्टन्टाइन यांना पुन्हा सत्तेवर आणण्यास विरोध प्रकट केला, असे सरकारतर्फे जाहीर केले आहे.