हिमांशू
शेतकऱ्यांच्या परिस्थितीला तेच कसे जबाबदार आहेत, हे ठासून सांगणाऱ्यांची या देशात कमतरता नाही. शेतकऱ्यांना थोडीफार कर्जमाफी दिली किंवा अनुदानं वगैरे दिली की शिरा ताणून बोलणारे अनेक “तज्ज्ञ’ अक्षरशः फुटाफुटावर पेरलेले आहेत. असाच एकजण अचानक उगवून आला आणि अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीवर बोलू लागला. मार्केट कसं डाउन आहे आणि लोकांचा “स्पेंडिंग पॅटर्न’ बदलल्यामुळे कसे हाल होतायत वगैरे सांगू लागला. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सगळी क्षेत्रं “निगेटिव्ह’मध्ये गेली. म्हणजे त्यांचा वृद्धीदर शून्याच्या बराच खाली गेला. शेतीच्या उत्पादनात मात्र थोडी वाढ होऊन बळीराजानं 3.4 टक्के वाढ नोंदवली.
तज्ज्ञ महाशयांना काही शेतकऱ्याचं यश पसंत पडेना; किंबहुना मान्य करवेना! कधी नव्हे ते शेतकरी इतरांच्या पुढे गेला होता ना! “शेतीवर कुठं निर्बंध घातले होते?’ या प्रश्नापासून त्यानं बोलायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना फुकटच्या कर्जमाफीची कशी सवय लागलीये, इथंपर्यंतची नेहमीची रेकॉर्ड त्यांनी मनसोक्त वाजून घेतली.
शेतकरी शेतीसाठी कर्ज काढून मुलामुलींची लग्नं कशी करतात, हेही रंगवून सांगितलं. अर्थात, शेतकऱ्यांना त्यांच्या मुलामुलींची लग्नं करण्याइतकं उत्पन्न मिळायला पाहिजे, असं काही त्याच्या मनात आलं नाही. शिवाय, शेतीसाठी कर्ज काढून ते लग्नकार्यासाठी खर्च करणाऱ्यांचं प्रमाण किती टक्के आहे, हे विचारल्यावर त्याला काही बोलता येईना.
तेवढ्यात आम्ही काहीही न करता “तज्ज्ञ’ मित्र अचानक प्रचंड दचकला. दचकायला तर आम्हालाही झालं होतं. पण तज्ज्ञही दचकतात म्हटल्यावर आपलं दचकणं काहीच नाही, असं वाटून गेलं. दचकणं स्वाभाविकही होतं. गेल्या अनेक वर्षांत इतक्या जोरानं वीज कडाडलेली आम्ही पाहिलेली नव्हती. पूर्ण अंधारून आलेलं असताना विजेच्या लखलखाटानं इतका प्रकाश पडला की भीती आणखी वाढली. जोरजोरात पाऊस पडू लागला होता.
हा परतीचा मॉन्सून की वादळी पाऊस, हे कुणाच्याच लक्षात येईना. आधीच शेतकऱ्यांवर चिडलेल्या त्या “तज्ज्ञ’ मित्रानं मग पावसालाही चार-पाच शिव्या हासडल्या; पण त्यावरून आम्हाला एक युक्ती सुचली. “तज्ज्ञ’ मंडळी नेहमी श्रीमंत वगैरे असतातच. किंबहुना श्रीमंत असल्याशिवाय कुणाला “तज्ज्ञ’ म्हणताच येत नाही. “बॅंकेत लॉकर आहे का?’ आम्ही “तज्ज्ञ’ मित्राला विचारलं. त्यानं होकार दिल्यानंतर आम्ही त्याला एक “ऑफर’ दिली.
एक दिवस लॉकरमधला सगळा ऐवज काढायचा आणि रात्री अंगणात उघड्यावर ठेवून स्वतः मात्र बेडरूममध्ये आरामात झोपायचं. अशा अवस्थेत झोप लागणारच नाही, यावर आमचा “तज्ज्ञ’ मित्र सहमत झाला, तेव्हा आम्हाला आणखी बळ आलं. मग मोठ्या आत्मविश्वासानं आम्हीही आमच्यातला अर्धाकच्चा “तज्ज्ञ’ बाहेर काढला.
“आपल्याजवळचं सोनंनाणं आपण एक दिवस उघड्यावर ठेवू शकत नाही. शेतकऱ्याचं सोनं मात्र कायम उघड्यावरच असतं. ते कधी अवकाळी पडणाऱ्या पावसाच्या भक्ष्यस्थानी पडतं, कधी चोराचिलटाच्या हाती लागतं तर कधी शेजारच्या जंगलातली जनावरं फस्त करतात. कापणीपर्यंत टिकलं तरी सोन्याला मातीमोल भाव मिळतो आणि काहीजण कर्जमाफीमुळे चिडतात…’ हे ऐकून “तज्ज्ञ’ मित्र जरा शांत झाला. अचानक कोसळणारा परतीचा मॉन्सून जिथं शहरात आम्हाला डिस्टर्ब करत होता, तिथं खेड्यातल्या शेतकऱ्याची काय कथा!