हिमांशू
आजपासून आम्ही स्वतःस “जगातील सर्वांत शक्तिमान व्यक्ती’ म्हणून घोषित करीत आहोत. आम्हास कोणत्याही दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आलेली नसली तरी आम्ही स्वतःच दर्जेदार आहोत, सबब पॉवरफुलही आहोत. “दर्जेदार’ असा स्टिकरसुद्धा आम्ही स्वतःच स्वतःच्या कपाळावर चिकटविला आहे. आम्हास कोणतीही उपाधी देण्यासाठी कोणी शिफारस अथवा शिक्कामोर्तब करावे, याची आम्हास बिलकूल गरज वाटत नाही.
व्यक्तींमधील शक्ती जोखणाऱ्या फोर्ब्ज वगैरे फुटकळ जागतिक याद्यांवर आमचा विश्वास नाही; किंबहुना कुणाचाच असता कामा नये. हंगर इंडेक्स, फ्रीडम इंडेक्स आदी जागतिक क्रमवाऱ्यांवर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही आजपासून “अंधश्रद्धा’ म्हणून घोषित करीत आहोत. “ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ वगैरे सन्माननीय अपवाद वगळता जगातील सर्व याद्या आम्हास
वाकुल्या दाखविण्यासाठीच खास तयार केल्या जातात, या वास्तवावर आमचा अढळ विश्वास आहे. सोशल मीडियावरील वास्तवापासून तोंड लपवू पाहणाऱ्या आणि वास्तव विश्वात जगू पाहणाऱ्या “अवास्तववादी’ लोकांना आमच्या या विश्वासाचे मोल समजणे शक्य नाही. त्यामुळे आम्हीच स्वतःच्या हाताने स्वतःच्या शिरावर मुकुट ठेवणे आमच्या दर्जास साजेसे ठरते.
(मुकुटाचा इमोजी सापडला असून, सिंहासनाचा लवकरच सापडेल.) भूछत्राप्रमाणे जागोजागी उगवलेल्या जागतिक रेटिंग संस्थांप्रमाणेच जगातील सर्व लोकप्रिय व्यक्तीही (आम्ही वगळून) दुर्लक्षास पात्र आहेत. अशा व्यक्तींनी आपला वकूब ओळखूनच सोशल मीडियावर आमच्याशी “पंगा’ घेण्याचे धारिष्ट्य करावे.
दुर्दैवाने आमच्यावर कोणीही, कोणत्याही प्रकारचा खटला दाखल केलेला नाही. सोशल मीडियावरील आमच्या पोस्ट सेन्सॉर केल्या जाव्यात अशी मागणीही कोणी कोर्टात केलेली नाही. आम्ही “निरर्थक बरळतो’ असेही कोणास अद्याप वाटलेले नाही; किंबहुना आजवर तसे कोणी म्हटलेले नाही. किमान एखादातरी मानहानीचा खटला डोक्यावर असला तरी माणसास मानाने जगता येते. परंतु आमच्यामुळे आपली मानहानी झाली असेही अद्याप कोणास वाटलेले नाही. खरे तर, अनेकांना तसे वाटले असणार;
परंतु आमच्यावर खटला दाखल केल्यास आमची प्रतिमा उंचावेल, या भीतीने कोणी पुढे येत नाही हे आम्ही जाणून आहोत. परंतु कोंबडे कितीही झाकून ठेवले तरी सूर्य उगवल्याखेरीज राहणार नाही, हे त्या भाबड्या मंडळींना समजतच नाही. आपण वास्तवात जगतो, असे सांगण्याचा आटापीटा करणारे हे ढोंगी लोक सोशल मीडियावरील आमच्या पोस्टकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात.
त्या वाचाव्यात असा आमचा आग्रह नाहीच. किमान त्या निरर्थक आहेत, आम्ही वाट्टेल ते बडबडतो असे म्हणायला काय बिघडते? आमच्या पोस्टविषयी निगेटिव्ह कमेन्ट करण्यासाठी किंवा चार-दोन शिव्या हासडण्यासाठी असा कितीसा डेटा लागणार आहे? प्रश्न कंजुषीचा नाही; मनाच्या कोतेपणाचा आहे. कोणाला प्रसिद्धी द्यायचीच नाही म्हणजे काय..?
असो, प्रसिद्धी ही देण्याची नव्हे तर घेण्याची वस्तू आहे, हे आम्हास आता पूर्णपणे समजून चुकले असल्याने कोणाशीच आमचे देणेघेणे राहिलेले नाही. आम्हास कोणाचाच टेकू यापुढे नको आहे. “याल तर तुमच्यासोबत… न याल तर तुमच्याशिवाय’ आमचा प्रवास सुरूच राहणार आहे, कारण मार्ग आम्हास सापडलेला आहे. कित्येकांना तोच सापडत नाही. “सर्वांत शक्तिमान व्यक्ती’ हे बिरुद तर आम्ही मिळविलेच. यापुढेही मनात आणू ते मिळवू… पुरस्कारसुद्धा!