हिमांशू
अर्थशास्त्रात “घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत’ शिकल्याचे आठवते. या सिद्धांतानुसार, एखाद्या वस्तूचा आपण उपभोग घेत गेलो, की तिची उपयुक्तता कमी वाटू लागते. उदाहरणार्थ, भुकेच्या वेळी पहिल्या भाकरीची उपयुक्तता आपल्याला अधिक जाणवते. मात्र, दुसऱ्या भाकरीची उपयुक्तता तुलनेने कमी जाणवते. हळूहळू पोट भरलं की भाकरीची सीमांत उपयोगिता शून्य होते. जाणकारांच्या मते, या सिद्धांताला दोन अपवाद आहेत. एक पैसा आणि दुसरा व्यसन. पैसा जितका मिळेल तितका अधिक हवाहवासा वाटू लागतो. गरजेपुरता पैसा मिळवणाऱ्यांची स्वप्नं फार मोठी नसतात; पण जसजशी कमाई वाढू लागते तसतशा गरजा वाढत जातात आणि पैशांची उपयुक्तताही अधिक वाटू लागते. व्यसनाचं तसंच आहे. आधी शौक म्हणून सुरुवात होते आणि नंतर ती गरज बनून जाते, तेव्हा व्यसनाचं प्रमाण बरंच वाढलेलं असतं. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे, बिअरच्या विक्रीत मंदीच्या काळातही झालेली तुफान वाढ. देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असताना आलिशान मोटारींच्या विक्रीत झालेली वाढ, दणक्यात होणारी लग्नकार्यें अशा गोष्टींकडे लक्ष वेधून “कुठाय मंदी?’ असा प्रश्न अनेक महाभागांनी विचारला होता. खरं तर आलिशान मोटारी घेण्याची किंवा खर्चिक लग्नं करण्याची ऐपत असलेल्यांना मंदीची झळ कधीच पोहोचत नसते. पण ही उदाहरणं आम्ही गप्पगुमान ऐकली. आता एका नव्या उदाहरणाची भर: बिअर!
2019 मध्ये बिअरच्या विक्रीनं मागील तीन वर्षांचा विक्रम मोडीत काढला. अर्थव्यवस्था साडेचार टक्क्यांच्या दरानं वाढत असली, तरी बिअरच्या विक्रीत वर्षभरात चांगली 6.9 म्हणजे जवळजवळ सात टक्क्यांची वाढ झाली. यापूर्वी बिअरच्या उत्पादकांनी असा दणदणीत व्यवसाय 2016 मध्ये अनुभवला होता. त्यावर्षी बिअरची विक्री दहा टक्क्यांनी वाढली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, आपल्याकडे काही राज्यांमध्ये दारूबंदी आहे. बिहारमध्ये पूर्वीच बंदी लागू केली आहे, तर आंध्र प्रदेशात नुकतीच लागू करण्यात आली. त्यानंतरसुद्धा सात टक्क्यांच्या दरानं बिअरची विक्री वाढली असेल, तर कौतुकास्पदच म्हणावं लागेल! 2019 मध्ये मान्सूनचं आगमन लांबलं तेव्हा शेतकरी चिंताग्रस्त दिसू लागला. शेतकऱ्यांची चिंता अपवादानं का होईना, टीव्हीच्या पडद्यावर दिसत होती. पण बिअर उत्पादक बिचारे आपली चिंता कशी आणि कुठे व्यक्त करणार? मान्सून लांबल्यामुळं बिअरच्या व्यवसायावरही परिणाम होतो, हे कुणाला पटणारसुद्धा नाही! पण गेल्या वर्षी उत्पादक चिंतेत होते, हे खरं. परंतु तरीही बिअरच्या शौकिनांनी उत्पादकांना नाराज केलं नाही. मान्सून लांबला तर पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकेल; पण बिअरची टंचाई असता कामा नये, या निर्धाराने त्यांनी विक्रीचा आकडा वाढता ठेवला.
काही राज्यांमध्ये जशी दारूबंदी लागू झाली, तशीच गेल्या वर्षी काही राज्यांनी दारूवरील उत्पादन शुल्कही वाढवलं. पण शौकाचा दरवाढीशी काडीचा संबंध नसतो. “ड्राय डे’चा अर्थ “दारूमुक्त दिवस’ असला, तरी खरा अर्थ “दुप्पट दरानं दारू घेण्याचा दिवस’ असा असतो, हे शौकिनांना ठाऊक असतं. वेळ पडल्यास अधिक रक्कम मोजण्यास ते तयार असतात. त्यामुळंच बिअरच्या विक्रीत सातपट वाढ झाल्याचा निष्कर्ष “ग्लोबल डाटा’ कंपनीनं काढलाय. याला म्हणतात “ग्रोथ’!