सीएए आणि एनआरसीविरोधात पुकारला एल्गार
मुंबई : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जे झाले ते योग्य नव्हते. जेएनयुतील हिंसाचाराचा देशभरात निषेध होत आहे. हिंसाचाराच्या माध्यमातून सरकार हुकुमशाहीची निती वापरत आहे.
सरकारच्या या हुकुमाशाहीला महात्मा गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी येथे केले.नागरिकत्व दुरस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा एल्गार पुकारला आहे.
केंद्राच्या धोरणाला विरोध करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा 31 जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर पोहोचणार आहे. या गांधी शांती यात्रेला शरद पवार यांच्या उपस्थितीत आज गेट वे ऑफ इंडिया येथे हिरवा कंदिल दाखवण्यात आला. यावेळी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
नागरिकत्व दुरस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या निर्णयामुळे देशातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकत्व सिध्द करणारी कागादपत्रे नसतील सरकारने बांधलेल्या संक्रमण शिबिरात रहावे लागेल, अशी भीती लोकांमध्ये आहेत. समाजात या कायद्यावरून नाराजी आहे. या विरोधात तरूण पिढी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.
मात्र, ही आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका पवार यांनी केली. देशात निर्माण झालेली परिस्थिती बदलायची असेल तर गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग योग्य आहे, असे पवार म्हणाले.
यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या गांधी यात्रेचे कौतुक केले पाहिजे. सरकार आपले म्हणणे ऐकून घेईल असे नाही. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
यावेळी यशवंत सिन्हा यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री शशिकांत शिंदे, राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.