खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्यामुळे ससूनमध्ये दाखल
दाखलच उशिरा झाल्यामुळे ससूनमध्ये मृत्युची संख्या वाढली
– सागर येवले
पुणे – करोनामुळे शहरात 4 हजार 86 जणांचा मृत्यू झाला. एकट्या ससून रुग्णालयात 1 हजार 605 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. हे प्रमाण 40 टक्के आहे. त्यापैकी 142 जणांचा म्हणजे 9 टक्के मृत्यू हे ससूनमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच झाले. वाढत्या संसर्गाच्या काळात खासगी रुग्णालयांकडून अत्यवस्थ बाधितांना थेट ससून रुग्णालयात पाठवले जात होते. तो ससूनमध्ये पोहचेपर्यंत खूप उशीर झाला असल्याची दुसरी बाजू आता उजेडात येत आहे.
शहरात करोनाचा पहिला बाधित 9 मार्च रोजी सापडला. तर 2 एप्रिल रोजी पहिल्या बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी प्रथमत: नायडू, ससून आणि काही मोजक्या रुग्णालयात बाधितांवर उपचार होत होते. तज्ज्ञांच्या सल्लयाने बाधिताला लक्षणानुसार औषधे देत असत.
मार्च ते सप्टेंबर महिन्यात बाधितांसह मृतांची संख्या वाढत होती. त्यामध्ये ससून रुग्णालयात मृतांचे प्रमाण अधिक होते. त्यावरून रंगलेल्या राजकीय नाट्यात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतरही ससूनमधील मृत्यू वाढतेच राहिले. बाधिताला उपचारासाठी उशीर झाल्यास व्हेंटिलेटरची गरज भासत होती. ते कमी पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला.
करोनाच्या काळात सुरवातीपासून काही ठरावीक खासगी रुग्णालये सोडली तर अन्य सर्व रुग्णालये अत्यवस्थ बाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत, बाधिताला ससून किंवा नायडू रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत होते.
मात्र, नायडूमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा तटपुंजी होती, त्यामुळे ससून रुग्णालयाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णालयावर ताण येत असतानाही येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना उपचार दिले जात असत.
4 हजार 758 जणांवर उपचार
ससून रुग्णालयात आतापर्यंत 4 हजार 758 बाधितांना उपचार देण्यात आले. त्यामध्ये 2 हजार 669 बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 605 बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 15 हजार 133 संशयित व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला.