कोंढवा – “पुणे महापालिकेत समाविष्ट पिसोळी ग्रामस्थांना जादा कर आकारला जात आहे. यामुळे स्थानिक शेतकरी आणि मध्यमवर्गीय रहिवासी उद्ध्वस्त झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे आम्ही आत्महत्या करायच्या का?’ असा संतप्त सवाल
पिसोळी गाव कृती समितीने पुणे मनपा आणि राज्य शासनाला विचारला आहे. “ग्रामपंचायत नियमांप्रमाणे कर आकारणी करा, अन्यथा आमची ग्रामपंचायत परत करा,’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “पिसोळी गावामधील गोडाऊन, वेअर हाऊस मिळकतींना ग्रामपंचायत टॅक्सपेक्षा 15 पट वाढवून मनपा टॅक्स लावण्यात आला आहे,’ असा आरोप करत ग्रामस्थांनी आंबेकर हॉटेल चौकात कात्रज रस्ता अडवून पालिकेच्या धोरणाचा निषेध केला.
“या करवाढीबद्दल पालिका प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ; मनपासमोर ठिय्या आंदोलन करू,’ असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी कात्रज बाह्यवळण मार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.
आंदोलक ग्रामस्थ म्हणतात…
स्थानिक शेतकरी पुत्रांनी बिल्डरांना जमिनी देण्यापेक्षा बॅंकांची कर्जे काढून गोडाऊन, वेअर हाउसेस उभारली. यातून ट्रान्सपोर्ट, हॉटेल्ससह विविध व्यवसायांतून रोजगार निर्माण झाले. पुणे मनपाने पिसोळीच्या गोडाऊन मिळकतींना 15 ते 20 पट टॅक्स आकारल्याने आता कर्जांचा हप्ता भरणेही कठीण झाले आहे. मनपा हद्दीतून आमचे पिसोळी गाव वगळून पुन्हा ग्रामपंचायत करावी. अन्यथा मंत्रालयापर्यंत आम्ही आंदोलन करू. राज्य सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे अशीही मागणी ग्रामस्थ, युवा उद्योजक आणि महिलांनी केली.