मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन हे बॉलीवूडमधील विशेष चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांनी ‘रावण’, ‘गुरू’ आणि ‘कुछ ना कहों’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र गेली कित्येक वर्ष या दोघांनी एकत्र काम केलेले नाही. परंतु आता चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
दिग्दर्शक मणिरत्नम् यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याला एकत्र काम करण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चित्रपटाचे नाव काय असणार ? याचे चित्रीकरण कधी सुरू होणार? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मणिरत्नम् यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन- भाग 1 आणि 2’ या चित्रपटात ऐश्वर्या झळकली होती. या चित्रपटातील तिच्या लुकचे आणि अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. याशिवाय अभिषेकचा ‘दसवी’ चित्रपटही विशेष चर्चेत होता.
यानंतर आता हे दोघे कोणत्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने लग्न केलं. त्यांना आराध्या बच्चन नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. बच्चन कुटुंब नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात.