नवी दिल्ली – अयोध्येच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिला त्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक दशकांचा वाद या निकालामुळे आता कायमचा संपुष्ठात येईल असे त्यांनी म्हटले आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच शांतता आणि सलोखा कायम राखावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
अयोध्या वादातून देशाच्या सामाजिक सलोख्याला आणि ऐक्याला तडे गेले होते. त्यातून अनेक वेळा अनुचित प्रचार आणि शांतताही धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज जो निकाल आला आहे त्याचा सर्वच समाज घटकांनी सन्मान राखला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली शहरातही खबरदारीची सारी उपाययोजना करण्यात आली होती.