खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली सदिच्छा
मुंबई: राज्यातील सत्तास्थापणेचा तिढा आता सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आता खुद्द राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापण करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. दरम्यान, राज्यपालांनी सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. आमचीही तीच भूमिका पूर्वीपासून होती. राज्यपालांनी संविधानानुसार पाऊल उचलले आहे. सत्ता स्थापण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या शुभेच्छा असल्याचे शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी म्हटले आहे.
खरेतर भाजपने इतक्या दिवस थांबण्याची गरजच नव्हती. त्यांनी तेव्हाच सत्ता स्थापन करण्याचा दावा करायला हवा होता. अनेक राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच जर कोणी सरकार बनवण्यास तयार नसेल तर शिवसेना ही जबाबदारी घेईन, असे ठामपणे सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना राऊत यांनी अयोध्या निकालावरुन भाजपवरही निशाणा साधला. राम मंदिर हा संपूर्ण देशाचा मुद्दा आहे. तो कोणा एका पक्षाचा नाही. यासाठी बजरंग दल, विहिंप, साधू-संतांनी यासाठी कष्ट घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा संपूर्ण देशासाठी होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील अस्थिरता संपवायची असेल तर राज्यपालांनी पुढाकार घेऊन भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलवायला हवेच होते. राज्यपालांनी त्यांना फक्त सत्ता स्थापनेबाबत विचारले आहे. भाजपने 24 तासांतच दावा करायला हवा होता. भाजपने एवढे दिवस का लावले माहीत नाही. शिवसेनेने राजकारणाचा कधीच व्यापार केलेला नाही, हे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही निशाणाही साधला.
बहुमत विकत घेऊ शकतो असे समजणाऱ्यांचा त्यांनी भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कॉंग्रेसचे आमदार फुटतील असे वाटत नाही आणि शिवसेनेचे आमदार फोडण्याची कुणात हिम्मत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, याचा पुनरुच्चारही केला. यावेळी त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुकही केले. कॉंग्रेस नेत्यांची भूमिका ही स्थिर सरकार आणण्यासाठी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.