नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने 21 एप्रिल पासून दिल्लीच्या विविध भागातील नागरीकांचे एक सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यात त्यांना तीन प्रमुख प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील मुख्य प्रश्न दिल्लीत व देशाच्या अन्य भागात होणाऱ्या हिंसाचार व दंग्यांच्या प्रकाराला कोणता पक्ष जबाबदार आहे हा होता. या सर्वेक्षणात 91 टक्के लोकांनी दंग्यांच्या प्रकारांना भाजप हा पक्षच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज या सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर केला.
ते म्हणाले की या सर्वेक्षणात एकूण 11 लाख 54 हजार 231 लोकांनी आपले मत नोंदवले आहे. दिल्ली शहराच्या कानाकोपऱ्यातून ही माहिती गोळा करण्यात आली. त्यात 91 टक्के लोकांनी दंगलीच्या स्थितीला भाजपलाच जबाबदार धरले असून 8 टक्के लोकांनी कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे. तर 1 टक्के लोकांनी अन्य संघटनांना दोषी ठरवले आहे. याच सर्वेक्षणात कोणत्या पक्षात जास्त सुशिक्षित व सभ्य लोक आहेत असाही एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात 73 टक्के लोकांनी आम आदमी पक्षात सर्वात जास्त सुशिक्षित आणि सभ्य लोक असल्याचे मत दिले आहे.
15 टक्के लोकांनी कॉंग्रेस व 10 टक्के लोकांनी भाजपला या बाबतीत मते दिली आहेत असे सिसोदिया यांनी सांगितले. कोणत्या पक्षात सर्वात अशिक्षित लोक आहेत या प्रश्नाला 89 टक्के लोकांनी भाजप असे उत्तर दिले आहे असेही ते म्हणाले. या सर्वेक्षणातून भाजप पुरती बेकनाब झाली आहे असा दावाही सिसोदिया यांनी केला आहे.