नवी दिल्ली – आम आदमी पक्षानेही ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेला विरोध केला आहे. देशभरात सर्वच निवडणूका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेमुळे संसदीय लोकशाहीच्या कल्पनेला हानी पोहोचेल कारण त्रिशंकू विधानसभांसह, पक्षांतर आणि आमदार,खासदारांच्या खुल्या खरेदी-विक्रीच्या दुष्कृत्यांना यामुळे सक्रियपणे प्रोत्साहन मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
१८ जानेवारी रोजी वन नेशन, वन इलेक्शन संबंधात नेमण्यात आलेल्या समितीचे सचिव नितेन चंद्र यांना लिहिलेल्या पत्रात, आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी म्हटले आहे की, या संकल्पनेच्या अंमलबजावणीमुळे केंद्र स्तरावर सत्ताधारी पक्षाला प्रादेशिक पक्षांवर अन्यायकारक लाभ मिळणार आहे. यातून केंद्रातील सत्ताधारी पक्षाला प्रादेशिक पक्षांवर कुरघोडी करण्यास रान मोकळे मिळते.
ही संकल्पना संसदीय लोकशाही, राज्यघटनेची मूलभूत रचना आणि देशाच्या संघीय राज्यव्यवस्थेला हानी पोहोचवेल. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पना त्रिशंकू विधानसभांना सामोरे जाण्यास असमर्थ आहे, असेही आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.
एकाचवेळी मतदान करून वाचवण्याचा प्रयत्न केला जाणारा खर्च हा भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या फक्त ०.१ टक्के आहे,इतकाच आहे असेही आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, एकाच वेळी निवडणुका घेतल्याने भारतीय बहु-पक्षीय व्यवस्थेवर हानिकारक परिणाम होईल, जेथे अनेक पक्ष मुख्य प्रवाहाच्या राजकारणात पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उदयास आले आहेत.