मी निवांतपणे झोपाळ्यावर बसून लाडू खात होतो. समोर माझी दोन जुळे मुलगा मुलगी व आक्काचे मुलगा व मुलगी तसेच लहान्या रघूचा मुलगा दिवाळीची मजा लुटत होते. लाडू खाताना मी चक्क पस्तीस वर्षे मागे गेलो… मी जेमतेम चौथीत होतो. रघू पहिलीत. आक्काने तिसरीनंतर शाळा सोडली. ती तिनेक वर्षांनी मोठी होती. झोपडीवजा छोटे घर, बाजूला त्यांच्या पुरती भातशेती. खोताच्या वाड्यावर अण्णा कामाला जायचे. तेथे शेतीची कामे, आंबा, काजू कलमाची कामे, रोजची साफसफाई, पाणी घालणे व पडेल ती कामे करत. आई एक-दोन घरी भांडी घासण्याची कामे करी. ती भाऊबीज मी कधीच विसरणार नाही. दररोजच्या खाण्याची मारामार त्यात कसली दिवाळी नि कसलं काय? दिवाळीत वाड्यावर मोठी कामे असत. आई-अण्णा दोघांनाही वाड्यावर जावे लागे. दिवाळीच्या दिवशी आई पटापटा सर्वांसाठी चपात्या करून गेली. रेशनवर गहू थोडे मिळाले होते. अक्काला चटणी व मोठे पातेल्यात नुसता गरगट्या भात कर, असे सांगून गेली.
…आम्ही दुपारी इकडे तिकडे फिरून जेवायला घरी आलो, तर ताईनी म्हणजे आक्काने भातच वाढला. आम्ही गपगुमान गिळून घेतला. सायंकाळी आई अण्णा घरी आले. आईनं जेवणाचे विचारताच आम्ही म्हणालो, “सकाळी भातच खाल्ला.’ त्यावर आईने आक्काला विचारले तर आक्का म्हणाली की, “मी माझ्या चपात्या खाऊन घेतल्या. तेवढ्यात बाहेर मोठा आवाज आला म्हणून बघायला गेले. काळुबाचा बैल गाडीसकट बसला. त्याला उठता येईना. म्हणून गर्दी झाली होती. घरी येऊन पाहते तर चपात्यांचा डबा उघडाच राहिला व कुत्र्याने सर्व चपात्या खाऊन टाकल्या.’ आईला खरे वाटेना. आईने आक्काला जाम दरडावले. आक्का पण रडू लागली. आई म्हणाली, “तू तुझ्या चपात्या खाऊन घेतल्या आणि पोरांना भाताशी ठेवले. का तूच त्या सगळ्या गिळून घेतल्या?’ त्यावर आक्का काही बोलली नाही. रात्री सर्व तोच गरगट्या भात जेवून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी भाऊबीज. आई तर अजूनही रागात होती. पण आता बहिणीने भावाला ओवाळाया हवे, मग छोटा तेलाचा दिवा लावला. आक्काने आम्हा दोघांना टिळा लावून ओवाळले. काही देणे घेणे असे नव्हतेच. दुपारी पुन्हा सर्वजण भात जेवायला बसले. दुसरे काही नव्हतेच. आईने आक्काला आवाज दिला. कारण आक्का अजून बाहेर शेतात काटक्या गोळा करत होती. आम्ही भात जेवायला सुरुवात केली. इतक्यात आक्का आमचा जुना पितळी डबा घेऊन आली. प्रत्येकाच्या पानातून तिने दोन दोन लाडू वाढले. आईसकट आम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. मग आक्का म्हणाली, “आज भाऊबीज होती म्हणून काल मी त्या सर्व पोळ्या कुस्करून ठेवल्या. माझ्याकडे साठलेल्या एक रुपयाचा थोडासा गूळ आणून त्या चपात्यांचे लाडू केले.’ म्हणजे काल दिवसभरात आक्काने काहीच खाल्ले नव्हते. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व तिने आक्काला जवळ घेतले. आम्हालाही खूप पश्चाताप झाला. कारण आम्हीही काल आक्कावर रागावलो होतो.
…दिवस, वर्षे कशी सरली समजले नाही. मी हुशार होतो. मी आता डॉक्टर आहे. आक्काचे लग्न बाजूच्या गावात एका व्यापाऱ्याच्या मुलाशी झाले होते. त्यामुळे त्यांचा व्यवसायही जोरदार आहे. छोट्या रघूने आयटीआय करून नंतर कृषी खतांची एजन्सी घेतली आहे. कृषी अवजारेही तो विकतो. सर्वांची लग्ने झालेली आहेत. सर्वांना मुलेबाळे आहेत. आई अण्णा अजूनही धडधाकड आहेत. रघूने व मी गावचे घर खूप चांगले सजवले आहे. मी रत्नागिरीत राहात असलो तरी सणवारी आवर्जून घरीच येतो.
आजही भाऊबीजेला बहीण आमच्या घरी येते. तिच्याकडे आदल्या दिवशी ती चपात्या जास्त करून ठेवते व सकाळी त्यात गूळ घालून त्याचेच लाडू त्याच जुन्या पितळी डब्यात घेऊन दरवर्षी येते. आता तिच्याकडे चारचाकी गाडी आहे. पण तरीही भाऊबीजेला आमच्याकडे पक्वान्न म्हणजे आदल्या दिवशीच्या चपात्यांचे आक्काने गूळ टाकून केलेले लाडूच. आक्काच्या हाकेने भानावर आलो. हातात गरमागरम चहा घेऊन ती मला म्हणाली, “अरे लाडू अजून हातात धरून ठेवला आहेस?’ “अं, हो, काही नाही’ असं म्हणून क्षणात तो लाडू मी गिळंकृत केला.
आठवण
उत्तम पिंगळे