वृंदावन सो वन नहीं,
नंदगॉंव सो गॉंव…
बंसीवन सो वट नहीं,
कृष्ण नांव सो नांव…
एकदा कृष्णाने आपल्या व्यापाचे विकेंद्रीकरण म्हणून “पुष्कर’ यास तीर्थराज घोषित करीत त्यास साऱ्या तीर्थक्षेत्रांचे राज्य बहाल केले. पुष्करने लगोलगच साऱ्या तीर्थांची सभा बोलावली. त्यास सारे आले पण वृंदावन काही आला नाही. तो न आल्याची तक्रार घेऊन तीर्थराज पुष्कर कृष्णाकडे पोहोचला, यावर कृष्ण म्हणाला…
“बाबारे… मी तुला तीर्थांचा राजा बनवले आहे, माझ्या घराचा नव्हे.’ या वरूनच स्वतः कृष्णाच्या लेखी वृंदावनाची महत्ती काय आहे ते कळते. या व अशा अनेक सुरसकथा ऐकत आम्ही वृंदावनात प्रवेश केला. वृंदावन हे बृज मंडलच्या पंचक्रोशीत विसावलेले एक निवांत गाव. बृजच्या परिधित गोकुळ, नंदगाव, बरसाणा, मथुरा इत्यादी गावे असलीतरी वृंदावन हाच संपूर्ण विश्वाचा आकर्षण केंद्र आहे. कृष्णाच्या भूमिपेक्षाही कृष्णावर प्रेम करणाऱ्यांची भूमी असे हिचे खरे लौकिक, म्हणूनच येथील जनमानसाचे कृष्णापेक्षाही राधावर अधिक प्रेम असल्याचं आढळून येतं.
श्रुतिनुसार राधाच्या सोळा नावांपैकी एक नाव “वृंदा’ असे होते आणि त्यामुळेच यास “वृंदावन’ हे नामाभिधान लाभले.
पुण्यातील नंदकिशोर राठी यांच्या कुटुंबियांची तेथे आधुनिक धर्मशाळा असल्याने आम्हा चाळीसजणांच्या निवासाची उत्तम व्यवस्था तेथे होती. भारतभरच्या तत्कालीन प्रतिष्ठित घराण्यांनी भाविकांसाठी भवन व धर्मशाळांचे मोठ्या प्रमाणावर निर्माण केले असल्याचे तेथील नागरी व्यवस्थेत दिसून आले. या साऱ्यांवर मुघल बांधकाम शैलीचा पगडा असला तरी यमुनेचं तीर, घाटां कुंडांचा वेढा, हजारो मठ-मंदिर उदरात सामावून असलेले वृंदावन मोठे धार्मिक स्थान असल्याचे पदोपदी जाणवत होते. वल्लभ, रामानुज, गोडीया, निम्बार्क, प्रणामी असे अनेक मतावलंबी संप्रदायांचे अनुयायांची रेलचेल इथल्या अध्यात्माचा सांभाळ करत असून हितहरिवंश यांचे सेवाकुंज, तानसेन यांचे गुरू हरिदास यांचे निधिवन, महाप्रभूजी की बैठक आदिने वृंदावनाचे धार्मिक महात्म्य अधोरेखित होते.
मीरा, तुलसीदास, सूरदास, रसखान सारख्या अनेक संतांनी वृंदावन येथे वास्तव्य करीत कृष्णाशी एकरूपता साधली.
पावलोपावली मंदिरांचे अधिष्ठान लाभलेल्या वृंदावनात प्रमुख मंदिरात रंगजी मंदिर, गोपेश्वर महादेव, जयपूरवाला मंदिर, गोविंददेवजी मंदिर कांचका मंदिर, जमाई ठाकुर, दावानल बिहारी, बॉंकेबिहारी, अष्ट सखी मंदिर, राधावल्लभ, भट्टजी, राधा दामोदर, शाहजी, राधा रमणजी, जगन्नाथ, टटिया स्थान, प्रेम मंदिर इत्यादींचा समावेश आहे. पोतंभर धान्य घेऊन एक एक मूठ प्रत्येक मंदिरासमोर ठेवत गेलो तरी धान्य संपेल; पण मंदिर नाही अशी या गावाची महिमा असल्याचे एका गावकऱ्याने अभिमानाने सांगितले.
इथल्या प्रत्येक मंदिराच्या व मूर्तीच्या मागे एक विलक्षण अशी कहाणी आहे. राधा रमणजीच्या मंदिराची दारे पहाटे 4.30 ला उघडली जातात तर, बॉंकेबिहारी मंदिराचा कृष्ण मात्र पावणे नऊला डोळे उघडतो. यामागची रंजक गोष्ट अशी की, बॉंकेबिहारी रोज रात्री निधिवन येथे रासक्रीडेसाठी जातात, त्यामुळे स्वाभाविकच झोपायला उशीर होतो आणि यामुळे उठणे ही उशिराच, म्हणूनच बॉंकेबिहारी मंदिरात काकड आरतीच होत नाही. अशा अनेक विस्मयकारी गोष्टींचा उलगडा पुढेही होत गेला.
राधा रमण मंदिरात रोज रात्री रंग भोग अर्थात कलेने कृष्णाची उपासना करण्याचा प्रघात आहे. हेमा मालिनीपासून शुभा मुदगलपर्यंत सारेच ख्यातनाम कलाकार इथं सेवा देण्यास उत्सुक असतात. शंकाराने कृष्ण दर्शनासाठी घेतलेल्या गोपीवेषामुळे शंकरास “गोपेश्वर’ या नावाची ओळख वृंदावनातच मिळाली. नगराचा फेरफटका मारताना “अंग्रेजों के मंदिर चलोगे?’ असे रिक्षावाल्यांनी विचारताच आम्ही चमकलो. इंग्रज आणि मंदिर हे काय गौडबंगाल? म्हणून आमचे कुतूहलही चाळवले. पुढे कळाले की परदेशी लोकांचा राबता असल्याने येथील ग्रामस्थ इस्कॉन मंदिरास “अंग्रेजों का मंदिर’ म्हणून संबोधतात.
लड्डू गोपाल म्हणत, कृष्णाचे इथं विशेष लाड कोड केलं जातात. उन्हाळ्यात गारव्यासाठी कुलर पंखे गाभाऱ्यात लावले जातात, तर हिवाळ्यात मूर्तीस कानटोपी मफलरमध्ये गुंडाळले जाते. जमाई ठाकुर मंदिरात कृष्ण जावई म्हणून पूजला जातो. तिथं त्याच्यासाठी हुक्का ठेवण्याची अजब अशी पद्धत आहे. शाहजी मंदिराचे निर्माते कुंदनलाल फुंदनलाल यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर आपले चित्र खोदवून ठेवले. हेतू एवढाच की मंदिरात येणाऱ्याची पायधूळ चित्रांवर पडावी म्हणजे वृंदावनच्या रजचा त्यांना निरंतर स्पर्श होतं राहील. असे लीन भाव इतर कुठं दष्टीस पडणे दुरापास्तच.
कालिया मर्दन, गोपींचे वस्त्रहरणाचे कदम्ब वृक्ष इत्यादीच्या दर्शनार्थ भाविकांची अलोट गर्दी असते. साजूक तुपातील मिठाई, दूध, लस्सी, चाट कचोरी हे पदार्थ इथले नियमित आहारातले. पर्यटकांशी प्रेमाने वागण्याचा वास्तूपाठ इथल्या नागरिकांत ठळकपणे जाणवतो. कृष्णाची बखान करणारे पद गाणारी मंडळीही पदोपदी दिसतात. वृंदावनवर अभ्यास करणारी मंडळी तसेच वृंदावन शोध संस्थान सारख्या संस्था आजही वृंदावनाचे तत्त्व उकलण्याच्या कामात गर्क आहेत.
दगदगीपासून लांब, मानसिक शांतीचा मागोवा धुंडाळणाऱ्या लोकांसाठी वृंदावन तर आधारावडच. आयुष्याचे उत्तरायण कृष्णार्पण करण्यासाठी येथे येऊन राहाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कृष्ण हाच पूर्णपुरुष आहे असे मानून स्वतःस त्याची सखी समजून स्त्री लक्षणात राहणारे अनेक पुरुष भक्तांचे समर्पण थक्क करणारे आहे. एकूणच वृंदावनातील वास्तव्य मनाला तरलता आणि शरीराला ऊर्जा देणारे आहे. असेच काहीसे चैतन्य अंगीकारत आम्हीही वृंदावनाचा निरोप घेतला. गाडी चालवणारा गुणगुणत होता… “वृंदावन का कृष्ण कन्हैय्या जगकी आँखों का तारा…’
परिघ
सत्येंद्र राठी-पुणे