सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्रींना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, असा तक्रारीचा सूर अनेक नायिकांकडून ऐकायला मिळतो. मानधनाबाबत तर ही तक्रार अलीकडील काळात वारंवार कानी येते. मध्यंतरी, कंगना राणावतसह अनेक अभिनेत्रींनी यावर जाहीर भाष्य केलं होतं.
पण मुद्दा केवळ मानधनाचाच नाही, तर नायिकांना केंद्रस्थानी ठेवून निर्माते-दिग्दर्शक चित्रपटांची निर्मिती करत नाहीत याबद्दलही अनेक नायिका खंत व्यक्त करताना दिसतात. पण गेल्या काही वर्षांत महिलाप्रधान चित्रपटांची संख्या वाढताना दिसत आहे.
अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने यावर भाष्य करताना असे म्हटले आहे की, तो दिवस फार लांब नाही, जेव्हा महिलाप्रधान चित्रपट 200 ते 500 कोटींचा व्यवसाय करतील ! तसेही आता महिलाप्रधान चित्रपटांची लाट आलेलीच आहे!’ विद्याचं म्हणणं अगदी खरं आहे.
सध्या दीपिका पादुकोणच्या “छपाक’बरोबरीनेच “पंगा’, “शंकुतला देवी’, “सायना’ यांसारखे जवळपास 7 महिलाप्रधान चित्रपट येऊ घातले आहेत. दुसरीकडे नायिकांना मिळणारे मानधनही आता वाढत आहे.
दीपिका पादुकोणचेच उदाहरण घेतल्यास ती एका चित्रपटासाठी 26 कोटी रुपये घेते. थलायवीसाठी कंगनाने 25 कोटी रुपये घेतल्याचे समजते.”कहानी’, “पिंक’, “मणिकर्णिका’ यांसारख्या महिला प्रधान चित्रपटांनी तिकिट खिडकीवर आपला करिष्मा यापूर्वीच दाखवला आहे. येणाऱ्या काळातही ही परंपरा कायम राहील असे दिसते.