योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे, भारतासारख्या विषुववृत्तीय प्रदेशासाठी पूरक व्यायाम प्रकार (व्यायाम या संकुचित शब्दात योगाला बांधणे ही योग्य नाही). स्वतःशी असलेले नाते पुन्हा एकदा जाणून शांत व स्थितप्रज्ञ होण्यासाठी याशिवाय दुसरा मार्ग नव्हे.
स्त्री म्हणजे… बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणार व्यक्तिमत्व पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व. नारीकडे बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिला आदिशक्ती म्हणून तिची पूजा करण्याची आपली संस्कृती मात्र देवत्व बहाल केला म्हणून तिने सहनशीलतेचा कळस गाठला. संसाररथाचा तोल सांभाळायचा असेल तर स्त्री, पुरुष ही दोन्ही चाके मजबूत हवी.
स्त्री शरीर संरचना पुरुषांपेक्षा पुर्ण भिन्न गर्भाशय ही स्नायूंची जाड पिशवी असून आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोनी असते. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात. गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन बीजांडकोश असतात. त्यांमध्ये सर्वसाधारणपणे दरमहा एक याप्रमाणे बीजांडे तयार होतात.
बीजांडकोशातून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्रवतात. या संप्रेरकांमुळे गर्भाशयातील अंत:त्वचा फलित होणे, बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
आधुनिक नारीने कामानिमित्त उंबरठा ओलांडला मात्र तिच्या शरीरप्रकृतीची प्रचंड हेळसांड होत आहे, यांत्रिकीकरणामुळे कामात तत्परता आली पण शरीराचा पूर्वीसारखा वापर बंद झाला. बैठी जीवनशैली नाही तर उभे राहून कामे. यामुळे पुढे, मागे वळणे, मांडी घालून बसणे ह्या गोष्टी दैनंदीन जीवनातून निघून गेल्या.
पूर्वीच्याकाळी एका स्त्रीला आयुष्यभरात सात/आठ मुले व्हायची. यामुळे गर्भाशय सतत कार्यरत असे तसेच अंग मेहनतीची कामेही करावी लागत. त्यामुळे पूर्ण शरीराचे योग्य मर्दन होत असे. निसर्गाचा नियम आहे… ज्या अवयवाचा वापर होणार नाही तो हळू हळू निकामी होईल.
करियरमध्ये स्थिरता यावी यासाठी लग्नाचं वय वाढत गेला त्या अनुषंगाने गर्भधारणा उशिरा, उलटपक्षी पौंगडावस्था लवकर येऊ लागली. त्यामुळे गर्भ पिशवीवर विपरीत परिणाम होऊ लागले. प्रजननक्षम आरोग्याचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. संकोच वा भीतीमुळे त्याविषयी फारशी जागरूकताही दिसून येत नाही. स्त्रियांमधील प्रजनन आरोग्याचा मुद्धा महत्वाचा असून त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
हठयोगात नमूद केलेल्या आसन, प्राणायाम, शुद्धीक्रिया, बंध, मुद्रा यांचा परिणाम शरीरात खूप खोलवर होतो.
पश्चिमोत्तानासन, हलासन, वक्रासन, उडियान बंध यासारख्या आसनाद्वारे गर्भपिशवी, बीजांडकोश व आजूबाजूच्या स्नायूची मालिश होते, तिथला रक्त पुरवठा वाढवला जातो, ती कार्यक्षम केली जातात. कपालभाती, धोती सारख्या शुद्धीक्रियद्वारे योग्य संप्रेरके स्रवतात.
जीममधे केल्या जाणाऱ्या सर्व हालचाली ह्या सकयू पोषणाचा विचार करुन केल्या जातात. त्यामुळे फिटनेस तर जाणवतो पण स्वास्थ लाभ होतं नाही. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते त्यामुळे आजराच्या नावाप्रमांणे त्याला एकच योग अभ्यासक्रम नाही ठरवता येऊ शकत त्यामुळे युट्यूब वर पाहून किंवा पुस्तकं वाचून योग करू नये, डॉक्टर किंवा योगचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा.
प्राणायामेन युक्तेन
सर्व-रोग-क्षयो भवेत।
अयुक्ताभ्यास-योगेन
सर्व-रोग-समुद्गमःहयो।।
योग्य प्रकारे योग केला तर सर्व रोग नष्ट होतात; मात्र अयोग्य प्रकारे प्राणायाम केला तर नवीन रोग उद्भवू शकतात.