पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून मनसैनिकांना संबोधित केलं. राज्यात झालेला सत्ताबदल, शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणे या महत्वपूर्ण राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरेंनी माहिम समुद्रातील वादग्रस्त दर्ग्याभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावं असं ठणकावून सांगितलं होत.
आणि त्यानंतर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. यावेळी माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, आता या सगळ्या प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पुण्यात त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळं आता राज ठाकरेंविरोधात वाकड पोलीस ठाण्यामध्ये वाजीद रजाक सय्यद यांनी तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. ‘गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी काल मुंबईत भाषण केलं, या भाषणामुळं दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करा’ असं तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.