रघुनाथ थोरात
चरेगाव – एरवी पितृपंधरवडा म्हटलं की ग्रामीण भागात या पंधरा दिवसांत एकच लगबग असायची. सध्या पितृपंधरवडा अंतिम टप्प्यात आहे. सर्वपित्री अमावस्येला पितृपंधरवडा समाप्त होत असला; तरी या पंधरवड्यात ठिकठिकाणी पूर्वीची दिसणारी धांदल आता दिसेनाशी झाली आहे. इतकेच काय; तर नैवेद्य काढून घरावर बराच वेळ काव…काव… करत काकस्पर्शासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रासपणे आढळून येत आहे.
त्याचबरोबर जेवणावळींनाही घरघर लागली असून काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इतर पक्षांप्रमाणे कावळ्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. पितृपक्षात नैवेद्याला शिवण्याचा मान कावळ्याला असल्यामुळे या दिवसात कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असते.
पूर्वी ग्रामीण भागात पितृपंधरवड्याच्या दिवसांमध्ये खूप धांदल असायची. घरोघरी जेवणावळी असल्याने पंधरा दिवस घरी चूल पेटवायची गरज भासत नसे. भल्या पहाटेपासून घरातील स्त्रियांची स्वयंपाकाची धांदल चालायची. भोजनाच्या पंगती दिवसभर चालायच्या. परंतु, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता पितृपक्षातील जेवणावळींना घरघर लागली आहे. पूर्वी पित्र पंधरावड्यात प्रत्येकाच्या घरी हमखास 100 लोकांना तरी आमंत्रण असायचे. सध्या मात्र, एक जोडा जेऊ घातला जात असल्याचे आढळून येत आहे.
एकूणच काय; तर सध्याच्या संगणकीय युगामध्ये प्रगतीकडे झेपावताना मानवाला भारतीय संस्कृतीशी निगडित असलेल्या जुन्या चालीरीतींचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे येणार्या पिढीला या गोष्टींपासून मुकावे लागणारे असून निश्चितच हे संस्कृती ऱ्हासाचे लक्षण आहे; असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर?
सध्याच्या वातावरणीय बदलामुळे कावळ्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. झाडांवर घरटे करून वास्तव्य करणारा हा पक्षी झाडांच्या कत्तलीमुळे रोडावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत अनेकदा पक्षी मित्र व पक्षी निरीक्षकांनीही चिंता व्यक्त केली असून काक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे की काय? असा प्रश्नीही त्यांना सतावत आहे.