मंचर, दि. 16 (प्रतिनिधी) -भागडी (ता. आंबेगाव) येथील गवारी-आदक मळ्यात वनविभागाने शनिवारी (दि. 15) सायंकाळी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. अजूनही तेथे दोन बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
भागडी गावाच्या पश्चिम दिशेला गवारी-आदक मळा आहे. तेथे संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी राहतात. गेल्या दीड महिन्यांपासून या वस्तीत बिबट्यांचा वावर आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झालेले आहे.
शनिवारी (दि. 15) सकाळी आदक हे शेतकरी वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना एकाच वेळी तीन बिबटे दिसून आले. आदक यांनी सरपंच गोपाळ गवारी यांना घटनेची माहिती दिली.
सरपंच गोपाळ गवारी यांनी मंचर वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांना तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानुसार वनविभागाने गवारी-आदक मळा येथे पिंजरा लावला. शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. दरम्यान, अद्यापही या परिसरात अद्याप दोन बिबटे आहेत. त्यांचा ही वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.