पारगाव – गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने चांगले काम केले असून जगात भारत देशाची मान उंचावली आहे. 9 वर्षांत सरकारमध्ये कुठलेही भ्रष्टाचाराची प्रकरणे किंवा तसे आरोप झाले नाहीत. ही स्वच्छ कारभाराची पावती आहे, असे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मोदी 9 जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमात व्यक्त केले.
चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार कुल यांनी माहिती देताना, विविध चांगल्या योजना या सरकारच्या काळात आल्या.
कुल म्हणाले की, चिभाड जमिनीच्या बाबतीत सातत्याने प्रयत्न करीत आलो असून लवकरच ते काम मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभाग खडकवासलाचे पाणी टनेलच्या माध्यमातून आणण्यासाठी 2 हजार कोटी खर्च होणार असून 14 हजार कोटींची जागा वापरण्यास मिळणार आहे. त्यामुळे अडीच ते तीन टीएमसीचे पाणी उपलब्ध होणार आहे. मुळशी धरणाचे पाणी आपल्या विभागात वळविण्यासाठीची प्रोसेस सुरू आहे. जनाई, शिरसाई योजना कार्यान्वित होऊन तालुक्यातील सर्व बंधारे भरण्याचा प्रयत्न राहील.
कुल म्हणाले की, दौंड तालुक्यात 1500 कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत. कासुर्डी ते पाटस असे 80 कोटीचे प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. त्यामुळे लवकरच तेही काम सुरू होईल. हडपसर ते उरुळी असा भारतमाला योजनेतून हा रस्ता होणार आहे. तालुक्यात केडगाव – चौफुला-न्हावरा रस्त्याचे काम सुरू झाले असून लवकरच ते पूर्ण होईल. प्रांत कार्यालय महिना दीड महिन्यात सुरू होईल. दौंड, यवत पोलीस स्टेशन इमारतीचे काम मार्गी लागणार आहे.
मागासवर्गीय निवासी शाळा दौंडमध्ये सुरू होत आहे. 60 कोटींच्या योजनेची दौंडला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे. भीमा सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे. मालकी सभासदांची आहे. हंगाम व्यवस्थित पार पडला. कारखाना योग्य दिशेने चालला आहे.
यावेळी भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, हरिश्चंद्र ठोंबरे, उमेश देवकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कुरकुंभला टेक्नॉलॉजी सेंटर
कुल म्हणाले की, कुरकुंभमध्ये टेक्नॉलॉजी सेंटर होते. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला निश्चित दिशा मिळणार आहे. दौंड नगर परिषदेला विविध कामांसाठी भरीव मदत केली आहे. क्रीडा संकुलसाठी जागेचे काम झाले असून त्यासाठी साडे आठ कोटी फंड उपलब्ध होत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून साडेचारशे कोटींची कामे तालुक्यात सुरू झालेली आहेत. दूध दर 34 रुपये करा, अशी मागणी होती. ती पूर्ण होतेय. साखर दर निश्चित होणे गरजेचे होते त्यासाठी साखरेचा दर निश्चित केल्याने सर्वांना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.