सोमेश्वर (प्रतिनिधी)- सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांच्या मोकळ्या वसाहती मधील पाचटाला दि. २३ मे (शनिवार) रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत झोपडीसह जनावरांसाठी साठून ठेवलेला चारा मात्र जळून खाक झाला,यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सायंकाळीच्या सुमारास जोराचा वारा असल्याने काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. कारखान्याच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वारा असल्याने ही आग आटोक्यात येत नव्हती.
ही घटना कळताच वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमेश्वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कारखान्याचा अजून एक पंप आणि निरा जूबिलंटचा अग्निशामक बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली.