भवानीनगर – जाचकवस्ती (ता.इंदापूर) येथे शनिवारी (दि. 18) झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष व केळीच्या बागा भूईसपाट झाल्या आहेत. आधीच करोनामुळे शेतीमाल शेतातच सडत आहेत त्यातच अवकाळी पावसाने उरली सुरलेली बागही नष्ट झाल्याने शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आधी करोना अन् आता अवकाळी जगू देईना असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जाचक वस्ती येथील कपिल जाचक यांची चार एकरवर केळीची बाग आहे. मात्र, शनिवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या बाबतीत उसाला दर नाही, द्राक्ष बागांची ही अवस्था, काही ठिकाणी द्राक्ष बागा उभ्या असूनही व्यापारी येत नसल्याने द्राक्ष विक्रीची अडचण निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी द्राक्षबागा देखील या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. पुढील काळात झाडांना केळीचे घड लागल्यानंतर त्या घडांच्या वजनामध्ये घट होणार आहे. या अशा सर्व प्रकारामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत सापडला जाणार असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरीत असल्याचे कपिल जाचक यांनी सांगितले.