औरंगाबाद – मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण सध्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांची लग्नाची इच्छा असतानाही लग्न जमत नसल्याचे चित्र आहे. त्यातच मुलींच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शेतकरी पुत्रांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. मुंबई, पुणे अशा शहरात नोकरीस असलेले किंवा शासकीय नोकरी असलेल्या मुलांनाच मुलगी देणार असा निश्चयच मुलींच्या घरच्यांनी केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी तरूण लग्नापासून वंचित राहत आहेत. अशातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. एक शेतकरी तरूणाने थेट आमदार साहेबांना फोन करून आपली व्यथा मांडली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना खुल्ताबाद तालुक्यातील एका तरूणाने फोन केला. घरी सर्वकाही चांगलं आहे, आठ-नऊ एकर शेती आहे. पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दु:ख त्याने आमदारांकडे व्यक्त केले. तसेच तुमच्या भागात जास्त मुली आहेत, तिथे कोणाला बोलून पहा अशी विनवणी देखील तो करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
काय आहे संभाषणात –
शेतकरी तरुणाने फोन केला आणि मी रत्नपूरमधून विजय होळकर बोलतोय. आपल्या घरी चांगलं आहे. एवढी काय वाईट परिस्थिती नाही, आठ-नऊ एकर जमीन आहे. पण इकडे कोणी मुलगी द्यायला तयार नाही. रत्नापूरपासून खाली फुलंब्री रोडवरून खाली 6 किलोमीटर गाव आहे. तुमच्या कन्नड सर्कलमध्ये देखील भरपूर मुली आहेत साहेब, लग्नासाठी मुलगी पाहा असे बोलत आहे. तर आमदार उदयसिंह यांनी समोरून उत्तर देताना म्हंटले की, बायोडाटा पाठवून द्या मी पाहतो. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरात लग्नाळू तरूणांनी जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी नवरदेवाचा साज चढवून घोड्यावर बसून वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सदर घटनांवरून लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण बाब झाल्याचे दिसत आहे. सध्या हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.