Rohit Sharma – भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने संघाच्या रणनीतीबाबत माहिती दिली. त्याचबरोबर यावेळी बोलताना त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. टी-२० क्रिकेट सोडण्याचा निर्णय मी अद्याप घेणार नाही, आयपीएलनंतर तो याबाबत विचार करेल, असे संकेत रोहितने दिले. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
INDvsSL2023 | विजयी सलामीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध उद्या पहिला एकदिवसीय सामना
मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लडविरुद्ध दारूण पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कर्णधार आणि प्रशिक्षकासोबत बैठक घेतली. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरेच धाडसी निर्णय घेण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते.
रोहितने दिले संकेत
टी-२० मालिकेसाठी झालेली संघ निवड पाहता बाहेर ठेवण्यात आलेलं हे वरिष्ठ खेळाडू आता यानंतर या फॉरमॅटमध्ये कमी खेळताना दिसतील असे म्हटले जात होते. मात्र, कर्णधार रोहित शर्माने आपण या फॉरमॅटमधून बाहेर पडत नसल्याचे स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा म्हणाला की, “तुम्ही एकामागून एक सामने खेळत राहणे हे शक्य नाही. म्हणूनच सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांतीची गरज असते. अद्याप मी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलेले नाही. आयपीएलनंतर काय निर्णय घेतला जातो ते पाहू.” रोहितच्या याच विधानाने चर्चा सुरु झाल्या आहेत.
Captain Rohit Sharma has no plans to ‘give up on T20Is’ anytime soon.#CricTracker #RohitSharma #T20I pic.twitter.com/pLVhpDa67l
— CricTracker (@Cricketracker) January 9, 2023
यंदाचे वर्ष टीम इंडियासाठी महत्वाचे
भारतीय संघासाठी यंदाचे वर्ष अत्यंत महत्वाचे असणार आहे. कारण भारत यंदा होणाऱ्या क्रिकेटमधील सर्वात मोठ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी मायदेशात पुन्हा एकदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची चांगली संधी असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी संघनिवड महत्वाची ठरणार आहे. कारण आयसीसीची एखादी स्पर्धा आली आणि भारताचा संघ घोषित झाला की, सर्वाधिक चर्चा ही त्या स्पर्धेसाठी झालेल्या संघनिवडीचीच होते. त्यामुळे अनेकवेळा भारताच्या निवडसमितीवर आणि निवड प्रक्रियेवर सवाल उपस्थित झालेले आहेत.