पवनानगर (वार्ताहर) – पवन मावळमधील अजिवली गावातील मुख्य रस्ता खोदल्यामुळे अजिवली ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आम्ही नक्की जायचे तरी कुठून असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर, माझी स्वतःची जागा आहे. म्हणत गेल्या ५ ते ६ दिवसांपूर्वी अजिवली गावातील वाघजाई मंदिराच्या समोरील मुख्य वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्याने खोदल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
या रस्त्यावरून कामगार, विद्यार्थी तसेच गावतील ग्रामस्थ ये – जा करत असतात. त्यात हा रस्ता गेल्या आठवड्याभरापासून खोदल्यामुळे येथील ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे. हा रस्ता खोदून ५ ते ६ दिवस उलटून गेले आहेत. तरी याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले आहे, ना ग्रामपंचायतीने रस्ता खोदणाऱ्यावर कोणती कारवाई केली आहे.
या मुळे येथील रस्ता लवकर झाला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर जाऊन आंदोलन करणार आहे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच हा रस्ता लवकर दुरुस्त करून द्यावा व होणारी गैरसोय त्वरित थांबवावी. तसेच या रस्त्याचे त्वरित काम व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
वाघजाई मंदिरा समोरील हा रस्ता हा पूर्वी पासूनच रस्ता आहे. हा रस्ता वहिवाटीचा आहे. गावातील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, तसेच महिला, वृध्दांना हा रस्ता खोदल्यामुळे मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रशासनाने आम्हाला हा लवकर रस्ता दुरुस्त करून द्यावा, या साठी आम्ही योग्य ती मदत लागेल ते सहकार्य करायला तयार आहे. – मनीषा जाधव, सरपंच, आजीवली.