पिंपरी (प्रतिनिधी) – केंद्रीय विद्यालय संघटनने (केव्हीएस) यंदा देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी बालवाटिका (नर्सरी) ते दहावीतील प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी एक एप्रिलपासून प्रवेशअर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल आहे. केंद्रीय विद्यालयांच्या बाल वाटिका-१, बाल वाटिका-२ आणि बाल वाटिका-३ या वर्गांसह पहिलीच्या प्रवेशासाठी kvsangathan.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरता येईल.
केंद्रीय विद्यालयांमध्ये दुसरी ते दहावीपर्यंतच्या जागा रिक्त असतील तरच प्रवेश दिला जाणार आहे. या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्यांच्या निवासस्थानाजवळील केंद्रीय विद्यालयाशी संपर्क साधावा लागेल आणि त्या शाळेच्या कार्यालयातून प्रवेश अर्ज घ्यावा लागेल. हा फॉर्म शाळेने ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत जमा करावा लागेल.
प्रवेशाबाबत वयाची अट
– बाल वाटिका एकमध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय तीन वर्षांपेक्षा कमी आणि चार वर्षांपेक्षा जास्त नसावे
– बाल वाटिका दोनमध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय चार वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे
– बालवाटिका तीनमध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी आणि सहा वर्षांपेक्षा जास्त नसावे
– पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय सहा वर्षांपेक्षा कमी आणि आठ वर्षांपेक्षा जास्त नसावे