मुंबई – ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे’, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ३० मार्च २०१८ रोजी संजय राऊत यांनी बेळगावात एक भाषण केले होते, हे भाषण प्रक्षोभक होते, असा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. त्यावरून राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावलं असून १ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी कर्नाटकात त्यांच्यावर हल्ल्याचा कट आखला जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “लोकांवर अन्याय केला तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील या वाक्यात प्रक्षोभक काय आहे, २०१८ मध्ये बेळगावात केलेल्या भाषणावर मला आता कर्नाटक पोलिसांची नोटीस आली आहे. मला कायदेशी बाबीत अडकवून ठेवण्याचे कट सध्या सुरू आहेत, पण मी घाबरणारा नाही. मी तिथं जाणार”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
यावेळी राऊत पुढे म्हणाले, “माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो. ही आता केंद्राची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीत राजकारण नका करू”, असे ते म्हणाले होते.