गुरुग्राम – हिंसाचारग्रस्त नूह जिल्ह्याला भेट देण्यासाठी गेलेल्या हरियाणा कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला आज हिंसाचार झालेल्या गावात जाण्यापासून रोखण्यात आले. हिंसाचारामुळे या गावामध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच सुरक्षेचा विचार करता कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला या गावामध्ये प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर हे शिष्टमंडळ परत गेले, असे पोलिसांनी सांगितले.
आपल्याला नूह शहरातील बाधित लोकांच्या समस्या ऐकायच्या आहेत आणि शांततेचा संदेश द्यायचा आहे. जेवढा बंदोबस्त आज ठेवला गेला आहे, तेवढा हिंसाचार झालेल्या दिवशी ठेवण्यात आला असता, तर दोन समुदायांमध्ये हिंसाचार झालाच नसता, अ
से राज्यसभा खासदार दीपेंद्रसिंग हुड्डा म्हणाले. नूहमधील हिंसाचाराला हरियाणा सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. सरकार निष्काळजी होते आणि सरकारचा हेतू निश्चितच योग्य नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.
नूहमधील हिंसाचाराची झळ बसलेल्या व्यापारी आणि अन्य संबंधितांना भेटण्यासाठी आणि शांततेचा संदेश पोचवण्यासाठीच कॉंग्रेसचे शिष्टमंडळ नूहला गेले होते. नल्हार येथील शिव मंदिराला भेट देण्यासाठीही आम्ही तेथे गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.
जे दोन होमगार्ड या हिंसाचारात मारले गेले, त्यांना हुतात्मा घोषित करण्यात यावे. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही हुड्डा यांनी केली.