विवेकानंद काटमोरे
मांजरी – मांजरी बुद्रुक गावच्या विकासात भर घालणारी अत्यंत महत्वाची नळ पाणी पुरवठा योजना, तसेच रेल्वेगेटवरील उड्डाणपूल, महादेवनगर ते गोपाळपट्टी सिमेंट कॉक्रीटीकरणचा रुंद रस्ता ,मुळा -मुठा नदीवरील पूल आणि रेल्वेगेट ते गावची वेस इथपर्यंत असलेला रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटचा रस्ता ही सर्व कामे मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, ही विकास कामे सात-सात वर्षे लोटली तरी अद्याप अर्धवट स्थितीत आहेत.
कोण्या एका विभाग किंवा एका व्यक्तीमुळे संबंधित भागाचा विकास होत नाही. तर, त्यासाठी टीम वर्क महत्वाचे आसते. हाच हेतू मांजरी बुद्रुक येथील या महत्वाच्या विकास कामांत अपवाद ठरला आहे.यामुळेच की काय जणू अर्धवट विकास कामांचा ‘मांजरी बुद्रुक पॅटर्न’ तयार होतो आहे.अशीच चर्चा केली जात आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत अस्तित्वात असताना आणि आता गाव महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतरही स्मार्टसिटीतील एक घटक असलेल्या मांजरी बुद्रुक गावातील ही अर्धवट विकास कामे अंदाधुंद कारभाराच्या खुणा आहेत असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मांजरी बुद्रुक गावासाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम एप्रिल २०१७ मध्ये सुरू झाले. ४३.२८ कोटींचा निधी उपलब्ध करून हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला गेला ,परंतु सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजनेचे ८५ टक्केच काम झाले आहे.पुणे-सोलापूर महामार्ग खोदून जलशुद्धीकरण प्रकल्पातून मुख्य जलवाहिनी जोडण्याचे महत्त्वाचे काम तेवढे बाकी आहे.
जुलै २०१८ मध्ये मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली. ५० कोटींचा निधी मंजूर असून सुमारे ३६.५० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पुलाच्या दोनही बाजूंच्या उतारावर जागा संपादन नसल्याने काम अर्धवट स्थितीत बंद आहे. मांजरी बुद्रुक- खुर्द मुळामुठा नदीवरील पुलाचे काम मे २०२१ मध्ये सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी २२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आतापर्यंत १२.३२ कोटींचा निधी खर्च केला असून सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
नदीच्या मध्य भागातील एक पाकळी जोडण्यासह पुलाच्या दोनही बाजुंना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम बाकी असून त्यासाठी किती कालावधी जाईल हे निश्चित नाही. रेल्वेउड्डाण पूल ते गावच्या वेशीपर्यंत पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण आणि कॉक्रीटीकरणचे काम जानेवारी २०२० ला सुरू करण्यात आले आहे.२०.१६ कोटींच्या निधीतून हे काम होत असून आतापर्यंत १५ कोटी रुपये कामासाठी खर्च झाले आहेत.
अवघे पावणे दोन किलोमीटर अंतरावरील हे काम रखडत रखडत सुरू आहे.मुदत संपूनही काम ७५ टक्केच झाले आहे. वन व गायरान भागात रुंदीकरण करण्याची मोठी अडचण येत असून नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास काम लवकर पूर्ण हॊईल अन्यथा किती महिने काम रखडले जाईल. हे स्पष्ट दिसत नाही.
पूनावाला ग्रुपच्या काॅर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलीटी (सीएसआर) च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने महादेवनगर ते गोपळपट्टी येथील सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम २०१७ मध्ये सुरू केले आहे.अंदाजे २५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र दोन ते तीन ठिकाणी काम रखडलेलेच दिसून येत आहे.
पूर्वी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि आता महापालिकेला येथील नागरिकांकडून आजवर कोट्यवधी रुपयांचा निधी( कर स्वरूपात) दिला आहे. परंतु, मांजरीकरांच्या वाट्याला अद्याप चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, उड्डाण पूल येवू शकलेले नाहीत. कोट्यवधी रुपयांची विकास कामे मागील सात, सहा आणि तीन व दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत.कदाचित भविष्यात ही कामे पूर्णही होतील. मात्र, त्यासाठी नागरिकांना आजवर सोसावा लागलेला त्रास न विसरता येणार असाच आहे.
प्रशासकीय अधिकारी वर्गातील टीम वर्कचा अभाव
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, रेल्वे विभाग, सरंक्षण मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय रस्ते विभाग, पुणे महानगर पालिका, विद्युत वितरण कंपनी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(पीएमआरडीए) या विभागातील संबंधित अधिकारी वर्गाने येथील कामांना प्राधान्य देऊन ‘टीम वर्क’ केले असते.तर, कदाचित मांजरी बुद्रुकचे चित्र वेगळे दिसले असते.ही विकास कामे वेळेत पूर्ण झाली असती. पर्यायाने जनतेचा वेळ आणि पैसाही वाचला असता.
विकास कामांत आजही या आहेत अडचणी
- दोन्ही कालव्यांच्या मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.येथून पुणे-सोलापूर महामार्ग दोन ठिकाणी खोदून मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी आणि पुरेशा निधी उपलब्ध नाही.
- सिरम कंपनीच्या सीएसआर फंडातून रस्त्याचे केलेले रुंदीकरण व कॉक्रीटीकरण करताना जागा संपादनाचा मोबदला न दिल्याने महादेव नगर कॉर्नर येथे एका जागा मालकाने रस्ता रुंदीकरण करू दिले नाही. तो वाद न्यायालयात आहे.
- रेल्वे उड्डाणपूल दोन्हीही उतारावर रखडला आहे. पूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला देताना दुजाभाव केला असा आरोप होत आहे. मोबदला थोडया जागेचा देवून प्रत्यक्षात मात्र जास्त जागा संपादित करण्यासाठी प्रशासन पुढे गेल्यावर संबंधित जागा मालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
- गायरान व वन विभागाच्या जागेवर असलेली घरी काढून घेण्यास नागरिक तयार नाहीत. याशिवाय रस्त्याच्या मध्ये येणारे ट्रान्सफार्मर आणि विजेचे खांब हलवण्यात येत नाहीत. त्यामुळे रंगीचा ओढा ते गावची वेस हा रस्ता रखडला.