संगमनेर (प्रतिनिधी) – स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप फोडून आमच्या हक्काचे धान्य चोरून नेल्याचा आरोप करत दुकानदार गुंजाळ व पुरवठा निरीक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तोंडी मागणी करत तहसील कार्यालयात जमा झालेल्या 250 ते 300 नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गुंजाळ (रा. गुंजाळवाडी), रमेश किसन नागरे (रा. शेडगाव, ता संगमनेर), अनिल गुंजाळ, सुयोग गुंजाळ, नैना कैलास रहाणे, किसन दत्तू गुंजाळ (रा.गुंजाळवाडी) आणि 250 ते 300 इतर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागासमोर आले.
तुम्ही विलास आबाजी गुंजाळ यांना स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करणेबाबतचा आदेश का दिला” या कारणावरून सर्वांनी भालेराव यांना घेराव घालून धक्काबुक्की करून दमदाटी केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार लोखंडेपुढील तपास करत आहेत.