हिंगोली – आदिवासी शाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता दहावीतील मुलीने वसतीगृहातील रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ती शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती वसतिगृहात राहण्यासाठी गेली होती. इयत्ता पाचवीपासून ती तेथे शिकत होती. मृत विद्यार्थिनीचे मूळ गाव वारंगा आहे. वसतीगृहाच्या वार्डन सविता विणकरे गुरुवारी सायंकाळी वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत मुख्याध्यापक किशन खांडरे यांना माहिती दिली. त्यानंतर बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
पोलिस तपासात विद्यार्थीनीच्या डाव्या हातावर ब्लेडने वार केल्याचे दिसून आले. विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकत होती. शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यांनी तिला त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच तिने गळफास घेतला, असे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत.