नगर – पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांस तत्काळ 15 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री संजय राठोड यांनी आज केली. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी गतीने हालचाली कराव्यात, असे आदेश नगर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, नगरच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी यावल, जळगाव, नाशिक येथील पथकांना पाचारण करण्यात आले आहे. नगरमधील पथकाने तातडीने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्याचे आदेश दिले आहेत. पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसांत बिबट्याने मानवी वस्तीत येवून हल्ले करण्याच्या तीन घटना घडल्या. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही वनमंत्री राठोड यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांना घटनेची माहिती दिली.
बिबट्याचा या परिसरातील वावर आणि परिसरातील नागरिक यांच्यामध्ये असणारी भीती याबाबत परिस्थिती हाताळण्यासाठी तत्काळ वन्यजीव पश्चिम विभाग, मुंबई येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि मुख्य वनसंरक्षक (नाशिक) गुदगे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सूचना दिल्या. अहमदनगर येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनीही घटनास्थळी जात नागरिकांशी संवाद साधला. यापूर्वी या परिसरात बिबट्याने दोन हल्ले केले आहे. मढी येथे 14 ऑक्टोबरला श्रेया सूरज साळवे (वय तीन), केळवंडी येथील सक्षम आठरे (वय आठ) याच्यावर 25 ऑक्टोबरला बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्या दोघांचाही बळी गेलेला आहे.