सातारा – करोनामुळे राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. जुलै 2020 पासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलेल्या होत्या. करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्यासंदर्भात प्रभाग रचना आणि आरक्षण अहवाल तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून करोनाचे संकट आले होते. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले होते. जुलै 2020 पासून मुदत संपली तरी करोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने तहकूब होत्या. करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण अहवालास अंतिम मंजुरीबाबत दि. 30 ऑक्टोबरअखेर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करताना मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा अहवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी देण्यात यावी.
या प्रक्रीयेसाठी दि. 27 ऑक्टोबर ही मुदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास दि. 2 नोव्हेंबर रोजी नमुना “अ’ मध्ये व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 च्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
राज्यातील तब्बल 14 हजार 600 च्या दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आता गावोगावी नेत्यांना निवडणुकीचा फिव्हर चढायला सुरुवात होऊ लागली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक राज्य आयोगाकडून नव्याने सुचना आणि नियमावली जाहीर होण्याची शक्यता असून त्याचे पालन करत निवडणुका पार पडनार आहेत.