नगर -अतिवृष्टीने यावर्षी राज्यात सगळीकडेच शेतमालाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भागात अचूक पंचनामे होतील, याकडे लक्ष असेल.
सरकारी नियमांना बगल न देता शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवू. त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केली. जिल्हाधिकारीपदी डॉ. भोसले यांनी आज मावळते जिल्हाधिकारी राहूल
द्विवेदी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ. भोसले यांनी पदभार घेण्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक माहिती जाणून घेतली होती. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने चार तालुक्यांत व दहा मंडलांत कापूस, सोयाबीन, तूर, मका व भूईमुगाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंचनाम्याविषयी तक्रारी आहेत. जेथे तक्रारी आहेत, तेथे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या टीमला त्या संदर्भात सक्त सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ज्या नुकसानग्रस्त भागात पोचणे शक्य नाही, तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून नजर अंदाजे, पीकपाणी पेरा अहवालानुसार पंचनामे करण्याबाबत विचार आहे. उद्या (गुरुवारी) पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा आहे.
त्यावेळी मीही जिल्ह्यातील पावसामुळे शेतीच्या झालेल्या स्थितीची पाहणी करेल, असे ते म्हणाले. नगर जिल्ह्यात करोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे. मृत्यूचे प्रमाणही घटलेले आहे. तथापि, करोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना कडकच असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.