पुणे -करोना प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणास मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार दि. 27 ऑक्टोंबर 2020 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व अंतिम प्रभाग रचना दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे पुणे जिल्ह्यातील सुमारे 758 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे बिगुल पुन्हा वाजले असून 2021 मध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
करोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्चला ग्रामपंचायत निवडणुकाचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते. यामुळे जिल्ह्यातील मार्च महिन्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका थांबल्या होत्या. तसेच ऑगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 758 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया थांबली होती.
त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतींचे निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. करोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या. आता मात्र निवडणुकीची प्रक्रियेची पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकींचा धुराळा उडणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे. सद्य:स्थितीत करोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.