भारतीय संस्कृतीत अध्यात्माचा दीप शेकडो वर्षांपासून तेवत आहे. मंदिरात नामस्मरणासाठी सर्वजण जातात. मात्र, याच मंदिरात गेली 17 वर्षे वाघोली (ता. हवेली) येथील सर्व धार्मिक स्थळांमध्ये पूजाअर्चा, आरती, अन्य धार्मिक विधी करणाऱ्या रत्नाबाई शिवाजी सातव यांचा अध्यात्माचा यज्ञकुंडातील दीप अखंड तेवत आहे.
वारकारी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या रत्नाबाई यांचा आदर्श सर्व गावकरी जोपासत आहेत. समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांची मुले सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. सध्या स्पर्धेच्या आणि भौतिक सुविधांमागे धावणाऱ्या समाजात नवदुर्गा रत्नाबाई सातव यांचा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वाघोली येथील गृहिणी रत्नाबाई शिवाजी सातव यांनी आतापर्यंत संस्काराची शिदोरी जपत अध्यात्माचे संस्कार आपल्या कुटुंबाबरोबर इतरांवर रुजवला आहे. रत्नाबाई सातव व शिवाजी दामोदर सातव या दाम्पत्यास 2 मुले 1 मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. या परिवाराने समाजामध्ये अध्यात्मिकबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रत्नाबाई यांचे पती शिवाजी सातव यांनी गेली 38 वर्ष टेल्को कंपनीमध्ये सेवा केली आहे.
भजन, कीर्तन, हरिपाठ, ग्रंथ वाचन यामुळे घरातील वातावरण अध्यात्मक बनवण्यामध्ये सातव परिवार यशस्वी झाले आहे. गेल्या सतरा वर्षांपासून वाघोलीमध्ये असणाऱ्या अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन त्याची विधिवत पूजाअर्चा करून रोज आरती पठण व मंदिरांमध्ये नामस्मरण करण्याचे संस्कार सातव कुटुंबीयांनी समाजाला दिले आहेत. आईच्या आध्यात्मिक आणि सामाजिक संस्काराचा वारसा त्यांची मुलगी विजया संपत भालेकर हिने देखील जपला आहे.
नुकतीच त्यांच्या मुलीची देखील अखिल विश्व वारकरी संप्रदाय परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक लहान मुलाचा वाढदिवस अनाथ गोरगरिबांना मदत करून साजरा करण्याची प्रथा गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये या कुटुंबाने आज अखेरपर्यंत जोपासली आहे. मुलगा प्रदीप शिवाजी सातव याने राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब अनाथ मजूर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्य तेवढी मदत करून आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागामध्ये सातव परिवाराने भेट देऊन शक्य तेवढी वस्तू रूपाने व आर्थिक स्वरुपात मदत केली आहे. अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या “नाम’ संस्थेला देखील लाखमोलाची मदत करून सातव परिवाराने सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. नुकतीच कोल्हापूर भागात कोविड केंद्राच्या उभारणीसाठी सातव परिवाराने लाखमोलाची मदत केली आहे.
एक शिकलेली आई घराला पुढे नेई, ही म्हण आता एक संस्कारक्षम असणारी आई संस्काराची शिदोरी त्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत असल्याचे रत्नाबाई सातव यांच्या रुपाने दिसून येत आहे. अध्यात्मिक व सामाजिक बांधिलकीचा एक नवा संस्कार रुजवण्यामध्ये रत्नाबाई सातव या यशस्वी झाल्या आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या आणि भौतिक सुविधांच्या मागे धावणाऱ्या युगात अध्यात्माबरोबर सामाजिक बांधिलकीची संस्कारक्षम केंद्रे उभारण्याची गरज एकीकडे निर्माण होत आहेत. दुसरीकडे अशा नवदुर्गा आपले वेगळेपण टिकवत समाजात एक नवा आदर्श निर्माण करीत आहेत.
– शब्दांकन : दत्तात्रय गायकवाड, वाघोली.