शेवगाव- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिलेल्या अपात्र व प्राप्ती कर दाते असणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम वसुल केली जाणार आहे. अहमदनगर जिल्हयातील या योजनेच्या ११ हजार ५९२ अपात्र लाभार्थ्यांची ६ कोटी ९३ लाख २२ हजार रुपये व १६ हजार ३७१ प्राप्ती कर दाते लाभार्थ्यांचे १४ कोटी ९६ लाख ८२ हजार अशी एकूण २१ कोटी ९० लाख ४ हजार रक्कम परत वसूल केली जाणार आहे.
या योजनेतंर्गत देशातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात २ हजार रुपये प्रमाणे
६ हजार रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला जात आहे.पी.एम.किसान प्रणालीमार्फत देण्यात आलेला लाभ हा अपात्र व्यक्तीच्या खात्यात, तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने या अपात्र लाभार्थ्याना अदा केलेला निधी शासनाने वसुल करण्यास सुरवात केली आहे.
चालू महिन्याच्या अखेरपर्यंत ही वसुली करण्याच्या सुचना असुन त्यासाठी तहसिल स्तरावर अपात्र लाभार्थ्यांच्या रकमा जमा करण्यास स्वतंत्र शासकीय बँक खाते उघडले जाणार आहे. गावनिहाय याद्या ग्रामस्तरीय समितीकडे दिल्यानंतर ही समिती संबंधित लाभार्थ्यांना भेटुन रक्कम वसूलीची कल्पना देणार आहे . रक्कम वसूली नंतर त्याची पीएम किसान पोर्टलवर माहिती भरुन संबधितास ऑनलाईन पोहचही दिली जाणार आहे.
जिल्हयातील १४ तालुक्यात ११ हजार ५९२ अपात्र लाभार्थी असून त्यांना ६ कोटी ९३ लाख २२ हजार रुपये, तर प्राप्ती कर दाते १६ हजार ३७१ असुन त्यांना १४ कोटी ९६ लाख ८२ हजार रुपये अशा एकुण२७ हजार ९६३ लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या २१ कोटी ९० लाख ४ हजार रुपये वसुली केली जाणार आहे. यातील अकोला, कोपरगाव ,नेवासे ,श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील ६ अपात्र शेतकऱ्यांनी लगेच ३४ हजार रुपये परत केले आहेत .
इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला गेल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने अशा अपात्र व्यक्तींना अदा केलेल्या रकमेची वसुली तालुक्यात सुरू झाली आहे . ‘प्राप्तीकर खात्याकडून इन्कम टॅक्स भरणाऱ्याच्या याद्या येथे मिळाल्या आहेत .
शेवगाव तालुक्यात एकूण ७८९ टॅक्स होल्डर असून त्यांना ६२ लाख७८ हजार रुपये तर ३३१३ अपात्र लाभार्थ्यांना ८५लाख८६हजार रुपये देण्यात आले आहेत . ते संबंधिताकडून वसूल केले जाणार आहेत, असं शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागीरे यांनी सांगितलं आहे.