मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं. परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी दोन्ही नेते आज दौऱ्यावर होते. अशातच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यावरून टोला लगावताना फडणवीसांनी, ‘संकट आलं की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं.’ अशा शब्दांमध्ये सुनावलं होत.
त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, ‘ केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? मोदी सरकार हे देशाचं सरकार, परदेशातील नाही’ असं प्रतिउत्तर दिलं.
फडणवीसांच्या टीकेवर पलटवार करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, “फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील. सध्या ते बिहारला जात आहेतच तसं त्यांनी दिल्लीतही जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील.” असा टोला देखील लगावला होता.
मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता फडणवीस यांनी प्रतिउत्तर देताना, ‘मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये’असं वक्तव्य केल्याने ही शाब्दिक चकमक आणखी रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना फडणवीस यांनी, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करु नये. पंतप्रधान मोदी देशावर संकट आलं तेव्हा थेट लडाखलाही गेले होते. त्यांच्याशी स्वतःची तुलना करु नका. आज थोडा वेळासाठी बाहेर पडलात, काही तासांचा प्रवास केलात ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करतं ते महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा करावी. केंद्र सरकार मदत करेल. मात्र राज्य संकटात असताना आणि संकटं जाणून घेत असताना अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही” असा टोला लगावला.