पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर अखेरीस लागणार आहे. गुणवत्ता यादी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. विद्यार्थी, पालक, शाळा यांना या गुणवत्ता यादीची उत्सुकता लागली आहे.
राज्यात 16 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. अंतरिम निकाल 9 ऑक्टोबरला जाहीर झाला. त्यानंतर 20 ऑक्टोबरपर्यंत गुणपडताळणीसाठी मुदत आहे.
आतापर्यंत पाचवीसाठी 621, तर आठवीसाठी 408 असे एकूण 1 हजार 29 अर्ज आले आहेत. त्यांच्या पडताळणीचे कामही सुरु झाले आहे.
काही अर्ज निकालीही काढले. सर्व अर्ज व आक्षेप तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. अंतिम निकालानंतर गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होणार आहे.